काश्मीर मधून शेवटच्या हिंदू पंडित महिलेने गाव सोडले !
टार्गेट किलिंग मुळे पुन्हा हिंदूंचे पलायन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
काश्मीर खोऱ्यात १९९० ला दहशतवादी कारवाया टिपेला पोहोचल्या असतानाही ज्या हिंदूंनी आपले गाव सोडले नाही, त्यांच्यावर आता निर्वासित होण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांकडून सतत होणाऱ्या टार्गेट किलिंग मुळे शोपियान जिल्ह्यातील चौधरीगुंड गावातील राहिलेल्या शेवटच्या कश्मीरी पंडित महिला डॉली कुमारी यांना आपले घरदार गाव सोडावे लागले आहे.

जम्मू काश्मीरात दहशतवादी कारवाया कमी झाल्या नाहीत. उलट टार्गेट किलिंग प्रचंड वाढले आहे. काश्मीर खोऱ्याबाबतचे केंद्रातील मोदी सरकारचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे. दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडित आणि बिगर काश्मिरी नागरिकांची निवडून हत्या केली जात आहे.

शोपियान जिल्ह्यात जून पासून दहशतवाद्यांनी ७ काश्मिरी पंडितांची हत्या केली. १५ ऑक्टोबरला चौधरी गुंड गावात दहशतवाद्यांनी पुरण कृष्ण भट यांची गोळ्या घालून हत्या केली. तत्पुर्वी शोफियान जिल्ह्यातच छोटीराम गावात सफरचंदाच्या बागेत एका पंडिताची हत्या झाली होती.

१९९० पेक्षाही भयंकर दहशत
१९९० च्या दशकात काश्मिरी खोऱ्यात दहशतवादी कारवाया टिपेला पोहोचल्या होत्या. त्या काळातही शोपियान जिल्ह्यासह काही ठिकाणी हिंदूंनी आपले गाव, घर, शेती, सोडली नाही. मात्र आज १९९० पेक्षा ही भयंकर दहशत आहे.

टार्गेट किलिंग मुळे शोपियान जिल्ह्यात चौधरीगुंड या गावातून दहा काश्मिरी पंडित कुटुंबांनी आपले घरदार गाव सोडले आहे. डॉली कुमारी ही पंडित महिला मात्र गावातच राहिली. तिचे शेवटचे एकमेव पंडित कुटुंब तेथे राहत होते. आता डॉली कुमारीनेही कुटुंबासह गाव सोडले आहे.

मोदी सरकार विरुद्ध पंडितांचा संताप
जम्मू काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट आहे. तेथील कायदा सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मात्र दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किलिंग मुळे काश्मिरी पंडित भयभीत आहेत. यापूर्वी अनेकदा पंडितांनी मोदी सरकार विरुद्ध आंदोलन करून संताप व्यक्त केला आहे.

इतर पंडितांनी गाव सोडले तरीही मी गावातच राहत होते. परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. मात्र, तसे कोणतेही चिन्ह दिसत नाहीत. प्रचंड दहशत आहे. त्यामुळे गाव सोडल्याशिवाय पर्याय नाही. आपले घरदार गाव सोडून कोणाला जावे वाटते का ? मी प्रचंड दुखी आहे. – डॉली कुमारी
(सौजन्य दैनिक सामना)
