मुलींप्रमाणे मुलांनाही सांभाळले पाहिजे – लेफ्टनंट जनरल डॉ. कानिटकर
जयंती महोत्सवात तरुणाईशी प्रेरणादायी संवाद
प्रतिनिधी —
पालकांनी मुलींप्रमाणेच मुलांनाही सांभाळले पाहिजे. चांगला समाज व चांगल्या भारतासाठी मुले, मुली दोन्हीही समान असून तरुणांनी आपली आवड ओळखून आवडीच्या क्षेत्रात करिअर साठी संधी शोधावी. यामुळे जीवनात यशस्वी ते बरोबर आत्मिक समाधान मिळेल असे प्रतिपादन आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले आहे .

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात एकविरा फाउंडेशनच्या वतीने ‘घे भरारी’ प्रेरणा संवादात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लीना बनसोड, लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ.जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, शरयु देशमुख उपस्थित होत्या.

यावेळी संगमनेर मधील युवकांशी संवाद साधताना डॉ. कानिटकर म्हणाल्या की, आज प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे आहेत. पालकांनी मुलांना ही मुलींप्रमाणेच सांभाळले पाहिजे. समाज व देशाच्या प्रगतीसाठी मुले व मुली दोनही गरजेचे आहे. पालकांनी सातत्याने मुलांशी संवाद करावा. मुलांच्या आवडीच ओळखून त्यांना त्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच युवकांनी देशसेवा ही प्रत्येक क्षेत्रात आहे असे समजून काम केले पाहिजे.

आपण जेथे काम करतो ते काम प्रामाणिकपणे करा. यशस्वी होण्याकरता स्वतःमध्ये आत्मविश्वासाबरोबर अनुशासन असायला पाहिजे. प्रतिकूलता ही आता कारण असू शकत नाही. स्पर्धेत टिकायचे असेल तर तुम्हाला नवीन काहीतरी करावे लागेल. संस्कार घेऊन आपला देश पुढे जात असून कोरोना काळात प्रत्येक माणूस सैनिक म्हणून घडला. असाच मानवतेचा धर्म वाढवण्यासाठी प्रत्येकाने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले.

तर डॉ. लीना बनसोड म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण जो निर्णय घेतला आहे. त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जे काही करणार असाल ते मनापासून करा. स्वतःची ध्येय ठरवा. पैसा व प्रसिद्धी साठी काम न करता आत्मिक समाधान साठी काम केले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये ही मोठी गुणवत्ता असून स्पर्धा परीक्षांमधून आता ग्रामीण भागातील मुले जास्त पुढे येत आहेत. गुणवत्ता असलेल्या तरुणांना नक्कीच मोठे भविष्य असल्याचे ही त्या म्हणाल्या.

आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतामध्ये तरुणांची मोठी संख्या आहे. या तरुण शक्तीच्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे. आज मोठ्या प्रमाणात नोकरीसाठी तरुण विविध परीक्षा देत आहेत. मात्र त्या परीक्षेत अपयश आले तर त्या तरुणाची व कुटुंबाची मानसिक अवस्था खचते. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी सरकारने काम केले पाहिजे असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निखिल पापडेजा यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर शहर व तालुक्यातील युवक युवती उपस्थित होत्या.

