बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना पुन्हा अटक करण्याच्या मागणीसाठी संगमनेरात मूक मोर्चा
प्रतिनिधी —
सन 2002 मध्ये गुजरात राज्यात गोधरा दंगलीच्या वेळी बिल्कीस बानो या महिलेवर काही नराधमांनी अतिशय क्रूर व निर्गुण अत्याचार केले. तिच्या गर्भातील बालकाची हत्या करण्यात आली आणि तिच्या छोट्या मुलीला मारण्यात आले. तर तिच्यासोबत असलेल्या आठ लोकांचे खून करण्यात आले. या सगळ्या अत्याचाराच्या विरोधात बिल्कीस बानो ठामपणे उभे राहिली. तिच्या संघर्षामुळे अकरा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची म्हणजे आजीवन कारावासाची शिक्षा दिली.

मात्र गुजरात सरकारने 15 ऑगस्ट 2022 रोजी या सर्व आरोपींची तुरुंगातून सुटका केली. त्यानंतर मिठाई वाटण्यात आली. आरोपींच्या गळ्यात पुष्पहार घालण्यात आले त्यांचे सत्कार करण्यात आले.
त्याच्या निषेधार्थ आणि आरोपींना पुन्हा अटक करण्यात यावी यासाठी संगमनेर प्रांत अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संगमनेरच्या प्रांताधिकार्यांना निवेदन देण्यात आले.

गुजरात सरकारच्या या निर्णयामुळे देशाची राजहत्तेकडे वाटचाल सुरू होण्याची भीती लोकशाही व संविधानावर विश्वास असणाऱ्या भारतीय नागरिकांना वाटत आहे. संगमनेर शहर तालुक्यातील संवेदनशील भारतीय नागरिकांनी मूक मोर्चा काढला होता.
या मोर्चात खालील मागण्या करण्यात आल्या. गुजरात सरकारने सोडून दिलेल्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय त्वरित रद्द करावा. आरोपींना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आजीवन करावासात ठेवण्यात यावे. बिल्कीस बानोच्या कुटुंबियांना संरक्षण मिळावे. केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून गुजरात सरकारला आरोपींच्या सुटकेचे आदेश रद्द करण्यास सूचना करावी. अशा मागण्या करण्यात करण्यात आल्या.

या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ समाजवादी नेत्या ॲड. निशाताई शिवूरकर यांनी केले. या मोर्चामध्ये बेबीताई जाधव, अब्दुल्ला हसन चौधरी, शाहरुख शेख, प्रा. शिवाजी गायकवाड, ॲड. अनिल शिंदे, सीमा मालानी, शांताराम गोसावी, शबनम शेख बानोबी शेख, विनोद भोईर, सोहेल शेख आदी सहभागी झाले होते.

