रहिमपूर शिवारातील वाळू उपसा बंद करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन !
भाजप युवा मोर्चाचा इशारा
प्रतिनिधी —
रहिमपूर आणि पंचक्रोशितून सुरु असलेला बेकायदेशिर वाळू उपसा केवळ महसुल प्रशासनाच्या आशिर्वादामुळेच सुरु आहे. याबाबत वाळू माफीयांवर कारवाई न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव सचिन शिंदे यांनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून रहिमपूर आणि पंचक्रोशितील गावालगत असलेल्या नदीपात्रातून सर्रासपणे वाळू उपसा करुन त्याची वाहतूक राजरोसपणे सुरु आहे. या संदर्भात मंडलाधिकारी, तलाठी आणि ग्रामसेवकांना पुर्व कल्पना दिल्यानंतरही त्यांनी कोणतीही कार्यवाही न केल्याने वाळू माफीयांना खुले रान सापडले आहे.
केवळ महसुल प्रशासनाला हाताशी धरुन सुरु असलेल्या या वाळू उपशामुळे शासनाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असतानाही राजकीय दबावापोटी महसुल प्रशासनाने याकडे डोळेझाक केली आहे.

संगमनेर येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या समन्वय बैठकीत वाळू उपसा सुरु राहील्यास संबधित गावाच्या तलाठ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या सुचना प्रांताधिकार्यांनी दिल्यानंतरही रहिमपूर गावात बेकायदेशीर वाळू उपसा सर्रासपणे सुरु असल्याचे उघड झाले आहे. याबाबत नागरीकांच्या भावना अतिशय तिव्र असून, महसुल प्रशासनाने बेकायदेशिर वाळू वाहतुक करणाऱ्या व्यक्तिंवर कारवाई करावी तसे न झाल्यास कोणत्याही क्षणी रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.

