वादळी वाऱ्यामुळे संगमनेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची आमदार विखे-पाटील यांच्याकडून पाहणी

नुकसान भरपाई, पंचनामे बाबत प्रशासनाला केल्या सूचना
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नूकसानीचे तातडीने पंचानामे करून मदतीसाठी शासनाला अहवाल पाठवा. सर्व पंचनामे व्यक्तिगत स्वरुपात करून ग्रामस्थांच्या समोर पंचनाम्याचे वाचन करण्याच्या सूचना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. पाॅलीहाऊस करीता शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जासंदर्भात केंद्राकडून मदत होण्याच्या दृष्टीने अर्थराज्य मंत्री डाॅ. भागवत कराड यांची भेट घेवून दिलासा देण्याची ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

वादळी वाऱ्यामुळे संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, औरंगपूर, सादतपूर, या गावामध्ये शती पाॅलीहाऊस तसेच राहात्या घरांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले. राहाता तालुक्यातील गोगलगाव येथेही या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नूकसानीची पाहाणी विखे यांनी केली नूकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच विविध वस्त्यांवर घरांचे नूकसान झालेल्या रहीवाशांना दिलासा दिला. संगमनेरचे तहसिलदार अमोल निकम राहात्याचे कुंदन हिरे, गटविकास अधिकारी नागणे यांच्यासह कृषी सहाय्यक तलाठी ग्रामसेवक आणि स्थानिक पदाधिकारी या पाहाणी दौर्यात सहभागी झाले होते.

निमगावजाळी येथे सर्वाधिक नूकसान पाॅलीहाऊसचे झाले. मोठ्या स्वरुपातील वादळाने पाॅलीहाऊस जमीनदोस्त झाले. साठवून ठेवलेल्या कांद्याच्या झालेल्या नूकसानीची पाहाणी विखे पाटील यांनी केली. शासकीय योजनेतून मिळालेल्या घरकुलांचे पत्रे उडून गेले त्यांना तातडीने स्थायी आदेशाप्रमाणे मदत करावी अश्या सूचना विखे यांनी दिल्या.

निमगावजाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात विखे यांनी सर्व ग्रामस्थ आणि अधिकारी यांच्याशी एकत्रितपणे संवाद साधून झालेल्या नूकसानीबाबत चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने सर्व पंचनामे स्वतंत्र करावेत. तीन दिवसांनी झालेल्या सर्व पंचनाम्याचे सामुहीक वाचन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गावातील बंद असलेला वीज प्रवाह तातडीने सुरू व्हावा यासाठी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता थोरात यांच्याशी त्यांनी दूरध्वनी वरून चर्चा केली. जादा टिम लावून काम पूर्ण करावे वीज प्रवाह सुरळीत करण्यास सांगितले.

शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बॅकेचे कर्ज घेवून उभारलेल्या पाॅलीहाऊसचे नूकसान मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ आली. यासंदर्भात तहसिलदारांनी बॅकांच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहाणी दौरा करून याबाबत मदतीचे प्रस्ताव तयार करावेत असे सूचित करतानाच घेतलेल्या कर्जाबाबत कसा दिलासा देता येईल याचा प्रयत्न आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून करू. यासाठी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड याची आपण भेट घेवून शक्य तेवढा दिलासा देण्याचा प्रयत्न निश्चित करू आशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.

औरंगपूर येथे घरकुलांच्या झालेल्या नूकसानीबाबत शासनाची मदत मिळेपर्यत ग्रामस्थांनी पुढाकार घेवून या रहीवाशांना मदत करावी. शासन स्तरावरून लवकर मदत कशी मिळेल याकरीता मदत व पुर्नवसन मंत्र्याची आपण व्यक्तिगत भेट घेणार असल्याचे सांगितले. या नैसर्गिक आपत्तीत जखमी झालेल्या रहीवाशांना तातडीने दवाखान्यात दाखल न केल्याबद्दल त्यांनी शासकीय यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली.
