आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप
प्रतिनिधी —
कोरोनाच्या संकटात आदिवासी बांधवांना मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार व एकात्मिक आदिवासी विभाग यांच्या वतीने आदिवासी नागरिकांसाठी दोन हजार रुपयांची किराणा किट व दोन हजार रुपये रोख असे दुसऱ्या टप्प्यातील खावटी अनुदान तालुक्यातील २५१ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे .

यशोधन कार्यालय येथे खावटी अनुदान योजनेअंतर्गत तालुक्यातील २५१ आदिवासी लाभार्थ्यांना दोन हजार रुपये किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकी संघाचे चेअरमन संपत डोंगरे, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, अनील सोमणी, पी.वाय. दिघे, नामदेव कहांडळ, राज्यस्तरीय प्रकल्प समिती सदस्य व जनसेवक बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे, बबन खेमनर, बाळासाहेब काकड, संजय केदार, सागर डोंगरे, अरुण गुंजाळ, भारत भालेराव, भारत कोल्हे, कैलास मोकळ, बाबासाहेब मालुंजकर, संतोष वरपे, राजू दिघे, अमोल सातपुते, संजय वरपे, वेणुनाथ सातपुते आदी उपस्थित होते.

या २५१ लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये अनुदान जमा झाले आहे .कोरोनाच्या महामारीने राज्यातील गोरगरिबांना उपजीविकेचे कोणतेही साधन नसल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडी सरकारने या आदिवासी बांधवांना २ हजार रुपये रोख व दोन हजार रुपयांचा किराणा वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार दुसऱ्या टप्प्यातील २५१ पात्र लाभार्थींना ५ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळाले असून दोन हजार रुपयांच्या किरणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना संपत डोंगरे म्हणाले की, कोरोणाच्या अत्यंत मोठ्या संकटात महा विकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य शेतकरी, आदिवासी बांधवांना मोठा आधार दिला. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गोरगरीब माणसाला विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी मदत केली. अडचणीच्या काळात झालेली ही मदत अत्यंत मोलाची ठरली आहे.

तर आदिवासी लाभार्थी मनीषा भुतांबरे म्हणाल्या की, हे सरकार आदिवासी गोरगरीब बांधवांसाठी खूप काम करत आहे. आम्हाला विविध योजनाचा लाभ मिळाला असून शासनाच्या विविध उपक्रमांचा लाभही मिळत आहे. या कामी गण निहाय नेमलेले जनसेवक अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत असल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवक बाळकृष्ण गांडाळ यांनी केले. सूत्रसंचालन संदीप गोपाळे यांनी केले. तर अनिल सोमाणी यांनी आभार मानले.
