शेती व्यवसायात आंतरिक पीक पद्धतीचा जास्त वापर करावा – आमदार डॉ. सुधीर तांबे

नारळ उत्पादनाबद्दल शेतकऱ्यांना आंतरिक पिकाचा ही फायदा

 प्रतिनिधी — 

 

भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र पारंपरिक शेती पद्धतीमध्ये बदल घडून शास्त्रोक्त पद्धत व अत्याधुनिक पद्धतीने शेती केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते. आंतरिक पिकाची उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळू शकतो. त्यामुळे या पद्धतीवर अधिक भर द्यावा तसेच नारळ ही कोणत्याही भागातही मोठ्या प्रमाणात येऊ शकते आणि त्यातून मोठे उत्पादन मिळू शकते असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासन व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शेतकरी जागृती कार्यक्रमात नारळ पीक या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.अमिता देवनाथ (उपसंचालक नारळ विकास बोर्ड केंद्र ठाणे) डॉ. शरद आगलावे (तंत्र अधिकारी नारळ विकास बोर्ड ठाणे) तसेच उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, जय हिंद लोकचळवळ कृषी विभागाचे अभयसिंह जोंधळे, दूध संघाचे संचालक संतोष मांडेकर, वैभव कानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ.तांबे म्हणाले की, भारत देश शेतीप्रधान आहे. त्यामुळे येथे शेतीचा मोठा व्यवसाय आहे. यापुढील काळात शेतीचे रूपांतर शाश्वत शेती करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. नारळ हे कोकणातच येते असा आपल्या शेतकऱ्यांचा समज आहे. परंतु शास्त्र युक्त पद्धतीने नारळाची लागवड केली तर त्या माध्यमातून आपण मोठे उत्पादन घेऊ शकतो. कृषी विभागाने नारळाचे मार्केटिंग करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल.

पुढील काळात शेतकऱ्यांनी चार – पाच प्रकारची शेती केली पाहिजे. त्यामध्ये फळझाडे, फुलझाडे, आंतरपीक हमखास उत्पादन देणारे पीक असे उत्पादन घ्यावी. त्यासाठी कृषी विभागाची मदत घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले.

 

याप्रसंगी नारळ पीक या परिसंवादात डॉ.अमिता देवनाथ, डॉ. शरद आगलावे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे आदींनी नारळ लागवडी विषयी माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी शॅम्प्रोचे मॅनेजर बबनराव सावंत,जगन्नाथ गोडगे, बाळासाहेब पवार, शांताराम पानसरे, संजय थोरात, बंडोपंत थोरात, विजय यादव, राहुल दिघे,भाऊसाहेब गुंजाळ, उत्तम वामने आदींसह तालुक्यातील प्रगतशील शेतकरी तसेच कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी केले तर वैभव कानवडे यांनी आभार मानले.

 

 

 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!