‘पेपरफुटी People’s तरुणांचे भविष्य धोक्यात; दोषींवर कठोर कारवाई करा: माजी मंत्री बाळासाहेब थोरात
टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने संताप ; लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पुन्हा पाणी
संगमनेर/प्रतिनिधी –
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याची वेळ आली आहे. ही घटना अत्यंत संतापजनक असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या विश्वासाला तडा देणारी आहे. लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मेहनतीवर, स्वप्नांवर तसेच भविष्यावर पुन्हा एकदा पाणी फिरल्याची संतप्त माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात थोरात म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात पेपरफुटी ही जणू नित्याची बाब बनली आहे. भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो तरुणांचे परिश्रम, वेळ आणि भविष्य धोक्यात आले आहे. शासनाच्या निष्काळजीपणाचा फटका प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.
“तरुणांच्या आयुष्याशी असा खेळ करणाऱ्या सरकारला आता जनता ‘पेपरफुटी सरकार’ म्हणून ओळखू लागली आहे.”

बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख मागण्या :
सखोल चौकशी :
टीईटी पेपरफुटीप्रकरणी तातडीने आणि सखोल चौकशी करण्यात यावी.
सूत्रधारांवर कारवाई :
या संपूर्ण गैरप्रकारामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
भविष्यासाठी उपाययोजना :
भविष्यात अशा संवेदनशील घटना पुन्हा घडणार नाहीत, यासाठी शासनाने प्रभावी व ठोस उपाययोजना कराव्यात.
सरकारकडून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, अशी खात्री आता उरलेली नसल्याचे सांगत त्यांनी युवकांच्या आक्रोशाची आणि त्यांच्या वेदनांची शासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी आग्रही मागणीही यावेळी केली.
