पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतल्याने ती पूर्ण करू — आमदार खताळ
५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
संगमनेर/ प्रतिनिधी —
ज्याप्रमाणे तळेगाव निमोण भागातील भोजापुर चारीच्या माध्यमातून तर साकुर पठारभागातील पाण्याचा प्रश्न उपसा जलसिंचन योजना आणि बॅरेज बंधाऱ्याच्या माध्यमातून मार्गी लावला जाणार आहे. त्याचप्रमाणे सावरगाव तळ, चंदनापुरी, हिवरगाव पावसा, झोळे आदी गावांना पाण्यापासून वंचित ठेवले जाणार नाही. “तुम्हाला पाणी देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.उपसा जलसिंचन योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले जाईल असा शब्द आमदार अमोल खताळ यांनी दिला.

तालुक्यातील सावरगाव तळ येथे नूतन ग्रामपंचायत इमारत, सभामंडप, व्यायामशाळा साहित्य, ग्रामदैवत म्हसोबा महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्ती राजेंद्र गाडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता दुरुस्ती तसेच जिल्हापरिषद शाळा,प्रवरामाध्यमिक विद्यालय आणि गावठाण परिसरात सोलर हायमास्ट दिवा बसविणे, स्मशानभूमी सुशोभीकरण करणे, तसेच पिंपळगाव माथा सावरगाव तळ चंदनापुरी रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे अशा ५ कोटी ७१ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, भाजप तालुकाप्रमुख गुलाब भोसले, माजी सरपंच प्रमोद राहणे, मधुकर थिटमे, सरपंच अनिता नेहे, भाजपचे अशोक कानवडे, गणेश दवंगे, श्याम राहाणे, अमित राठी, निलेश कनोजे, नितीन जोर्वेकर, माजी सरपंच दशरथ गाडे, परसराम नेहे, पोपट नेहे, शरद नेहे, रावसाहेब थिटमे, बाळासाहेब शेटे, सुधाकर नेहे, बाळासाहेब नेहे, लता नेहे, गीतांजली शिरतार, रोहिदास शिरतार उद्योजक गोरक्ष गाडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत दिलेला पाण्याचा शब्द पूर्ण करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे.या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सावरगाव तळ, झोळे चंदनापुरी, व हिवरगाव पावसा, या गावांना निळवंडे उजव्या कालव्या वरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे पाणी मिळणार असल्याने नागरिकांनी काळजी करू नये, माजी मंत्री स्व. बी. जे.खताळ पाटील यांनी सुरू केलेल्या परंतु मध्यंतरी अपूर्ण राहिलेल्या काही योजना पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
