नमो उद्यानासाठी एक कोटी रुपयांचा निधी महायुती सरकारचाच — साक्ष सुर्यवंशी
नगराध्यक्ष होण्यापूर्वी मंजूर निधीची आता फक्त जाहिरातबाजी
संगमनेर | प्रतिनिधी —
राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसाच्या निमित्त वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत संगमनेर नगरपालिकेला ‘नमो उद्यान’ विकसित करण्यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये १ कोटी रुपयांच्या विशेष निधीला मंजूरी देण्यात आली आहे. काल नगराध्यक्ष झालेल्यांनी जाहिरातबाजी थांबवावी आणि स्वतःचं काम दाखवावं अशी टीका संगमनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सुर्यवंशी यांनी केली आहे.

नगरसेविका सुर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, एका वर्षात आमदार अमोल खताळ यांनी कोट्यावधींचा विक्रमी निधी संगमनेर तालुक्यासाठी खेचून आणला आहे. मात्र महायुती सरकाराच्या तिजोरीत खडखडाट आहे त्यामुळे निधी आणलाच नाही, असा कांगावा करून मामा-भाचे संगमनेरात जनतेची दिशाभूल करत आहेत. आता वास्तव जनतेसमोर येऊ लागले आहे.

नगरपालिकेत सत्ता येताच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये, नगराध्यक्षांनी एक कोटी रुपये खर्च असलेल्या ‘नमो उद्यान’ प्रकल्पाला मंजूरी दिल्याचा मोठा गाजावाजा सुरू केला आहे. “स्वतःच्या घरातील पैसा खर्च करून उद्यान उभारावे अशाप्रकारचा आव आणला जात आहे.” मात्र वस्तुस्थिती पाहता, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून संगमनेर नगरपालिकेला नमो उद्यान विकसित करण्यासाठी हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय सप्टेंबर१७ सप्टेंबर २०२५रोजी घेण्यात आला असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले.

संगमनेर 2.0 ची स्वप्नं दाखवणारे लोक आता आमदार अमोल खताळ यांनी आणलेल्या कामांवर आणि निधीवर 2.0 सुरू झाले असल्याचे सांगत आहेत. महायुतीची नगरसेविका म्हणून याचा मला विशेष आनंद आहे. कालपरवा संगमनेरात आलेला कामगारांसाठीचा ‘सेवा दवाखाना’ याचेही श्रेय चोरण्याचा केविलवाणा प्रयत्न झाला. यासाठी आमदार खताळ यांनी केलेला पाठ पुरावा सर्व कागदोपत्री पुराव्यासह कुठेही आणि कधीही दाखवण्यासाठी आम्ही शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते तयार आहोत. इथून पुढे पदवीधर आमदाराची खोटी स्टंटबाजी संगमनेर मध्ये खपवून घेतली जाणार नाही.
