संगमनेरचे बिघडलेले वातावरण दुरुस्त करण्यासाठी सेवा समितीच्या पाठीशी उभे राहा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

1991 पूर्वी गोंधळ असलेल्या नगर परिषदेला आदर्श शिस्त लावली. सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर उभे केले. शुद्ध पाणी शहरात मिळत आहे. सुसंस्कृत व शांततेचे वातावरण आहे. वैभवशाली इमारती उभ्या राहिल्या आहेत. रस्त्यांसह अनेक कामे मार्गी लागली आहेत. सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. मात्र मागील एक वर्षांमध्ये काही अपप्रवृत्ती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत असून संगमनेर शहराची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी सर्वांनी सेवा समितीच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

गणेश नगर व जयहिंद सर्कल येथे संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेचे बोलत होते. यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आमदार सत्यजित तांबे, पांडुरंग घुले, श्याम पारख, अजित काकडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

थोरात म्हणाले की, 1991 पासून संगमनेर शहराला आदर्श शिस्त लागली. विकासाच्या अनेक योजना राबवल्या. तीस वर्षाच्या कार्यकाळात एकमताने सर्व ठराव पास झाले. एकदाही वाद झाला नाही. शहरासाठी आपण सातत्याने निधी आणून मोठमोठी विकास कामे मार्गी लावली. हायटेक बस स्थानक ,प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय ,पंचायत समिती, यांसह इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक आदर्श रस्ता बनवला. 35 गार्डन निर्माण झाली.

निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले शहरासाठी स्वतंत्र 38 किलोमीटरची पाईपलाईन टाकून पाणी आणले. शहरांमध्ये पूर्ण नवीन पाईपलाईनचे जाळे तयार केले. नवीन पाण्याच्या टाक्या तयार केल्या. त्यातून आज सर्वांना स्वच्छ पाणी मिळत आहे. या पाठीमागे कोणाच्यातरी कष्ट आहे. आपोआप होत नाही .सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. सर्वधर्मसमभावाचे हे शहर आपण जपले शैक्षणिक व सुसंस्कृत वातावरण निर्माण केले. हे सर्वांनी जपले पाहिजे.

मात्र मागील एक वर्षांमध्ये शहरांमध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. या पाठीमागे कोण आहे. तपासले पाहिजे. गुंडागर्दी वाढली आहे. पोलीस स्टेशन मध्ये मारामाऱ्या होत आहेत. ड्रग्स रॅकेट चालवणारा संगमनेर बस स्थानकासमोर झालेल्या मोर्चा मध्ये स्टेजवर बसतो आहे. यांना कोण परवानगी देतो हे तपासा. आपल्या सर्वांना संगमनेर मधील एक वर्षातील बिघडलेले वातावरण दुरुस्त करायचे आहे. सेवा समितीने अत्यंत कार्यक्षम उमेदवार दिले आहेत. या सर्वांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले.

तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगले उमेदवार सेवा समितीने दिले आहेत. शहराच्या विकासासाठी काम करणारी माणसं असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेरकरांनी संगमनेरकरांसाठी तयार केलेले व्यासपीठ म्हणजे सेवा समिती आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात सातत्याने विकासाचे कामे झाली. शांतता, बंधुता सुसंस्कृतपणा हे शहराचे वैशिष्ट्य राहिले. या विकासाच्या वाटचालींना नवा आयाम देण्यासाठी संगमनेर 2.0 राबविण्यात येणार आहे. शहरात गरिबांसाठी पक्के घरे देणार देण्याचा मानस असून बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कामुळे प्रत्येक मंत्र्याकडून निधी आणण्याची ताकद आपल्या मध्ये आहे. शहराच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही.

मागील एक वर्षापासून गुन्हेगारी अमली पदार्थाची तस्करी वाढली आहे. कोणी आता काही आरोप करेल. नेतृत्व करणाऱ्याकडे लोक येतात फोटो काढतात. त्यामध्ये नेत्याचा दोष नसतो. आपण कधीही गुन्हेगारांना पाठीशी घातलेले नाही हे सर्वांना माहीत आहे.यापुढील काळात महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन महिलांचे पथक गस्त घालण्यासाठी नियुक्त केले जाईल. विकासाचा पुढचा टप्पा घेऊन जाण्यासाठी नवे उमेदवार दिले असल्याचे ते म्हणाले.

डॉ. मैथिली तांबे उच्चशिक्षित व कार्यक्षम नेतृत्व

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ मैथिली तांबे ह्या डेंटिस्ट आहेत. याचबरोबर मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू कन्नड अशा विविध भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम असून अत्यंत धाडसी गृहिणी आहे. हाताला चव असणारी महिला शहराच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या साथीने नक्कीच चांगले योगदान देईल . त्यांच्या मार्गदर्शनासाठी जेष्ठ कार्यकर्ते असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!