संगमनेर साठी पालकमंत्र्यांचे योगदान काय ?
संगमनेरचा बंधुभाव शांतता आणि कायदा व्यवस्था बिघडवण्याचे काम सुरू आहे – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 9 —
1985 ते आतापर्यंत संगमनेर शहर हे अत्यंत सुरळीत चालले. विकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या. शांतता, बंधुभाव, सुव्यवस्था आणि आनंदाचे वातावरण हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले असून ही संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. मात्र मागील काही काळामध्ये दहशत गुंडगिरी वाढत चालली असून काही मंडळी शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा शक्तींना आपल्याला एकत्रित होऊन रोखायचे आहे.जनता आपल्या सोबत असून येणाऱ्या आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करा असे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सुदर्शन निवासस्थानी संगमनेर मधील विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, इसहाकखान पठाण, अरुण वाकचौरे सोमेश्वर दिवटे, डॉ.जयश्री थोरात, निखिल पापडेजा, किशोर पवार, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1991 मध्ये डॉ. सुधीर तांबे हे नगराध्यक्ष झाले आणि तेव्हापासून संगमनेर शहर हे अत्यंत काळजीपूर्वक आणि सुंदर सांभाळले. एकही आरोप कधी झाला नाही. प्रत्येक नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत चांगले काम केले. सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर 10 कोटींचे बक्षिसे मिळवले. सुंदर व स्वच्छ शहर म्हणून संगमनेरचा लौकिक असून झाडांचे शहर असलेल्या संगमनेर मध्ये 40 गार्डन आहेत.

निवडणूक संपली की विरोधक म्हणून आपण कुणाला कधी पाहिले नाही. सर्वांना बरोबर घेतले. चुकीचे असेल त्याचा बंदोबस्त केला. सुरक्षितता व बंधुभाव असलेले हे शहर सुकून असलेले शहर म्हणून नावारूपास आले.
शहर कुठे चालले आहे हा चिंतेचा विषय आहे. हनुमान जयंतीला लोटालोट कोणी केली, सोशल मीडियावर चुकीचे टाकले जात आहे. एजन्सी लावून संगमनेरला बदनाम केले जात आहे. हे एवढे फ्लेक्स येतात कुठून समजून घ्या. शहरांमध्ये गुंडगिरी वाढत आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहे .वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी परिस्थिती पूर्वी कधी नव्हती.
धर्माच्या नावावर फसवले जात आहे. आपले शहर हे आपले घर आहे. त्याचा नाश होऊ द्यायचा नाही. काही मंडळी इकडे तिकडे भाषणे करत फिरत आहे. त्यांचे संगमनेर साठी योगदान काय असा सवाल त्यांनी विचारला.
संगमनेर साठी पालकमंत्र्यांचे योगदान काय ?
साईनगर पुल वाहून गेला. यावेळी हा पूल तातडीने व्हावा याकरता मी प्रस्ताव केला. आमदार सत्यजित तांबे यांनीही पाठपुरावा केला. मात्र सध्याचे सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी आपण मंजूर केलेला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा चार कोटींचा निधी पुलासाठी वापरला आणि उरलेले अडीच कोटी बाहेर दिले. संगमनेर साठी यांचे काय योगदान? असा सवाल करत संगमनेरची संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. याकरता सर्वांनी एकत्र राहून काम करा विजय आपलाच आहे असे ते म्हणाले.
यावेळी दुर्गाताई तांबे, डॉ जयश्री थोरात, हिरालाल पगडाल, दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, किशोर पवार, ओंकार भंडारी, इसहाकखान पठाण यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शहरातील कार्यकर्ते युवक महिला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
