काम पूर्ण झालेले नसतानाही गटार कार्यान्वयीत करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी — आमदार सत्यजित तांबे
विधान परिषदेत दुर्घटनेबाबत आमदार तांबे आक्रमक
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरात नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे भूमिगत गटार जोडली. त्यामुळे दोन कामगारांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नगरपालिकेने किंवा सरकारने तातडीने प्रत्येकी 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी तसेच नगरपालिकेतील प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी आक्रमक मागणी विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात संगमनेर मधील भूमिगत गटारीत साफसफाईचे काम करत असताना दुर्दैवी तरुणांच्या मृत्यू बाबत आक्रमकतेने आमदार सत्यजित तांबे यांनी भूमिका मांडली.
या दुर्घटनेबाबत आमदार तांबे म्हणाले की, संगमनेर शहरामध्ये भूमिगत गटारीच्या कामांना 2021 मध्ये मंजुरी मिळाली. परंतु एसटीपीच्या जागेच्या वादामुळे हे काम अपूर्ण राहिले. काम अपूर्ण असतानाही नगरपालिकेने अनाधिकृतपणे ही गटार जोडली आहे. यामुळे गटारीचे काम सुरू असताना ठेकेदाराचा कर्मचारी अतुल पवार हा मृत्यू पावला व त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पिंजारी याचाही विषारी वायूमुळे मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे.

खरे तर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम अपूर्ण असताना ही गटार जोडण्याची गरज नव्हती. गटार जोडली नसती तर त्यामध्ये कचरा जाण्याचा प्रश्न नव्हता आणि त्यातून अशी दुर्घटना झाली नसती. याबाबत ठेकेदारांवर कारवाई झाली आहे. याचबरोबर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.

याचबरोबर मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना नगरपालिकेने प्रत्येकी 50 लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे. आणि जर नगरपालिकेला शक्य नसेल तर सरकारने याची भरपाई दिली पाहिजे. किंवा मुख्यमंत्री निधीतून तरतूद करून या दोन्ही मृत व्यक्तींना प्रत्येकी 50 लाख रुपये द्यावेत. दोनच दिवसांपूर्वी विधान परिषदेमध्ये गटार मध्ये उतरून साफसफाई संबंधित कायद्यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे मृतांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी तसेच नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आमदार तांबे यांनी केली आहे.
