बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी स्वबळावर उभे राहावे — शालिनीताई विखे

पेमगिरीच्या महाकाय वटवृक्षाखाली वटपोर्णिमा संपन्न  

प्रतिनिधी दिनांक 10

प्रत्येक महिलेच्या अंगी काही ना काही विशेष गुण असतात. त्या गुणांचा उपयोग करून महिलांनी स्वतःला सक्षम करावे, तसेच आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करावे. महिला बचत गटांच्या माध्यमातून सर्वच महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वबळावर उभे राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पेमगिरी येथील महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात वटपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली, या निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.‌ जाकमत बाबा तरुण मित्र मंडळ आणि संगमनेर तालुका महायुती महिला आघाडीच्या वतीने “उत्सव माझ्या कुंकवाचा वटसावित्री पौर्णिमेचा” या महिलांसाठी च्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ, पत्नी नीलम खताळ, पंचायत समिती माजी सदस्य सुनिता कानवडे, वर्षा डुबे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.

विखे म्हणाल्या की, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत रूढ होती त्यामुळे आई-वडिलां कडून मुलांना योग्य संस्कार मिळत होते, मात्र आता विभक्त कुटुंबपद्धत झाली आहे त्यामुळे संस्कार मिळणे कठीण झाले आहे. महिलांनी एकमेकींचे पाय खेचण्यापेक्षा एकमेकींना सहकार्य करावं, विधवा महिलेला समाजबाह्य न करता तिला मान-सन्मान द्यावा. पती गेला तरी महिला कुंकू लावू शकते. कारण तीही समाजाचा भाग आहे. मुलगाच वंशाचा दिवा नाही, मुलगी सुद्धा पणती आहे, अन ती कायमप्रकाश देत असल्याचे विखे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालिनीताई विखे पाटील, आमदार अमोल खताळ यांच्या मातोश्री मंगल खताळ ,पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित महिलांनी महाकाय वटवृक्षाची पूजा करून सर्व महिलांच्या बरोबरीने सात फेरे मारले आणि या वटसावित्री पौर्णिमेनिमित्त प्रत्येक महिलेला वडाचे रोप भेट देण्यात आले. वडाच्या रोपाचे घरी रोपण करावे त्यातून तुम्हाला ऑक्सिजन आणि स्वच्छ हवा मिळणार आहे. त्यामुळे या वटवृक्षाचे सर्व महिलांनी संवर्धन करावे असे आवाहन विखे पाटील यांनी केले.

वैष्णवी उपरे, निलम कासार, वर्षां प्रतीक्षा दीक्षित, सविता दत्ता कासार, मनोली नवले या सैनिक पत्नींचा तसेच बिबट्याच्या तावडीतून आपल्या मुलाला वाचविले म्हणून कविता खताळ यांचा वट वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. महिला पोलीस अनिता गुंजाळ, मीरा बिबवे, सविता सोळशे, शशीकला हांडे, शिला साबळे, सुवर्णा नवले, लता जाधव, सुषमा भांगरे, सविता रुपवते, प्रतिभा थोरात, लता जाधव, निशा धाडी, सुवर्णा नवले, माधुरी मुंडलिक या महिला कर्मचार्याचाही वडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!