वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संगमनेरात ठिय्या आंदोलन !
संगमनेर प्रतिनिधी दिनांक 22
मागील काही महिन्यांपासून संगमनेर शहरात सातत्याने अनियमित आणि खंडित वीज पुरवठा होत आहे. महावितरण कार्यालयाकडून याबाबत गांभीर्याने कुठलेही दखल घेतली जात नाही. यामुळे अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज नागरिकांनी महावितरण कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमेश्वर दिवटे, गजेंद्र अभंग, किशोर टोकसे, नूरमोहम्मद शेख, नितीन अभंग, संतोष मुर्तडक, जावेद पठाण, सुषमा भालेराव, वैशाली बर्गे, रामदास सोनवणे, तुषार अरगडे, श्रावणी खेमनर, कविता साळुंखे, मंगल साळुंखे, पूजा पावसे, सुवर्णा शिंदे, संजय कानवडे, सादिक तांबोळी, महेश सानप, लक्ष्मण बर्गे, अभय खोजे, शैलेश कलंत्री, विजय पांढरे, सोनल गांधी, नूतन गांधी, प्रमोद कडलग, मयूर वैराळ यांसह नागरिक उपस्थित होते.


या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर व परिसरात अनियमित वीजपुरवठा केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनियमित वीज, सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा, कमी किंवा जास्त होल्टेजची समस्या, तुटलेल्या तारा व अनेक रहदारीच्या ठिकाणी विजवाहक तारांना पडलेला झोळ, तसेच अनेक नागरिकांच्या घराजवळून गेलेल्या मेन लाईनच्या हाय व्होल्टेज लाईनच्या वीज वाहकतारांना संरक्षण कवच नसल्याने जीवित व मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पोल दुरुस्तीची कामे रखडली आहे. या समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः शहरी भागामध्ये वीज पुरवठा वेळेवर न होणे. तसेच तांत्रिक समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहणे. ही चिंताजनक बाब आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीकडून त्याची दखल घेतली जात नाही. याबाबत त्वरित पाऊले उचलने गरजेचे आहे.
तरी महावितरण कार्यालयाने पुढील ८ दिवसात या सर्व समस्यांचे निराकरण करावे. संगमनेर विभागासाठी एक स्वतंत्र हेल्पलाइन नंबर 24 तास कार्यरत सुरू करावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. यावेळी महावितरणचे खेमनर यांनी हे निवेदन स्वीकारले व तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

खंडित होणारा वीजपुरवठा ही चिंतेची बाब _ दुर्गाताई तांबे
मागील सहा महिन्यांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागात विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरण या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने तसे होत नाही. तालुक्यात सध्या असुरळीत वीज पुरवठा सुरू आहे. विचारणा केल्यास याबाबत उडवा उडवीची उत्तरे अधिकारी देत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. यावर तातडीने मार्ग काढावा अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालय विरोधात तीव्र निषेध आंदोलन करतील.
