बोगस बियाणांवर कृषी विभागाने लक्ष ठेवावे — आमदार अमोल खताळ

मनमानी करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करा

खरीप हंगाम आढावा बैठकीत आमदार खताळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

संगमनेर प्रतिनिधी दि. 8

शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणी येणार नाहीत याची कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसेच बोगस बियाण्यांमुळे सरकार व कृषी विभागाची बदनामी होत आहे, यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात खरीप पूर्वनियोजन व आढावा बैठक आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड, तहसीलदार धीरज मांजरे, सहायक वनसंरक्षक संदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, सहायक उपनिबंधक अधिकारी संतोष कोरे, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे, आदी उपस्थित होते.

आमदार खताळ म्हणाले की, आपला देश कृषिप्रधान देश असून शेतकरी हा केंद्र स्थानी आहे. त्यामुळे खते, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. अनेक कृषी सेवाकेंद्र चालकांकडून शेतकऱ्यांना खतांबरोबर जबरदस्तीने औषधे खरेदी करण्यास सक्ती केली जात असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत. जे कोणी कृषी सेवा केंद्राचालक असे प्रकार करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा खताळ यांनी देत यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कृषी विभागाने करावे असे स्पष्ट केले.

तसेच खरिपहंगामापूर्वी शेतकऱ्यांनी कुठली पिके घ्यावीत याविषयी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कृषी मेळावे घेऊन मार्गदर्शन करावे. यावेळी तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके यांनी खरीपहंगामापूर्वीचा आढावा दिला. किरण गोसावी यांनी शेडनेटमधून केळीचे भरघोस उत्पादन कसे घेतले याविषयी माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड आणि कृषी असोसि एशनचे जिल्हाध्यक्ष विवेक कासार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील घारगाव, साकूर व कोकणगाव या भागांतील मंडळ कृषी अधिकारी आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी आपल्या पर्यंत आलेल्या आहेत. याबाबत तालुका कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत तुमचा मनमानी कारभार अजिबात सहन केला जाणार नाही. अशी तंबी देत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करावीत, अन्यथा कठोर पावले उचलावी लागतील असाही इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.

मागील वर्षी नांदूर खंदरमाळ परिसरातील शेतकऱ्यांना शासनाची पिक विमा व नैसर्गिक आपत्तीची मदत मिळवताना अनेक अडचणी आल्या होत्या. यंदा अशा अडचणी टाळण्यासाठी शेतकरी ओळख पत्र वेळेत नोंदणी करणे गरजेचे आहे. पेरणीपूर्वी बिजप्रक्रिया करून पावसाच्या अंदाजा नुसार नियोजन केले पाहिजे. तसेच, “ई-पिक पाहणी आणि आगामी ई-पंचनामा ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना असून, शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवण्या साठी डिजिटल फार्मवर येणे आवश्यक आहे,” तसेच तालुक्यात बहुतेक ठिकाणी चारा पिके घरासमोर घेतल्यामुळे त्यात बिबटे लपून बसतात व त्यामुळे लहान मुले आणि शेतकऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने या पार्श्वभूमीवर वनविभागाने यासंदर्भात जनजागृती करावी — धीरज मांजरे,तहसीलदार संगमनेर

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!