प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यात ९१७६ घरकुले मंजूर
आमदार अमोल खताळ यांची माहिती
संगमनेर दि.5 प्रतिनिधी –
प्रधानमंत्री आवास योजना (पंतप्रधान आवास योजना ग्रामीण २.०) संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ९,१७६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

या योजनेंतर्गत समाजातील सर्वात गरीब आणि वंचित घटकांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र शासन ६०% आणि राज्य शासन ४०% असा आर्थिक सहभाग देत आहे. यात SC/ST घटकांसाठी २ हजार ५६४ अल्पसंख्याकांसाठी ९९२ आणि इतर घटकांसाठी ६ हजार ६२० घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

आमदार खताळ यांनी सांगितले की, ‘प्रधानमंत्री आवास योजना’ ही गरजू कुटुंबांसाठी मोठा दिलासा आहे. २०२५ पर्यंत ‘सर्वांना घर’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर मॉनिटरिंग समित्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी BPL सर्वेक्षण आणि सामाजिक-आर्थिक जनगणना डेटा यावर आधारित लाभार्थी निवड केली जात आहे.

योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच, योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्याचा ग्रामविकास विभाग आणि पंचायत समिती स्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाचे विशेष सहकार्य लाभले असून, संपूर्ण संगमनेर तालुक्यातील पात्र नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खताळ यांनी केले आहे.
