हरवलेल्या दोन मुलांना शिंदोडी ग्रामस्थांनी केले माता पित्याच्या स्वाधीन
संगमनेर दि. 19
तालुक्यातील पठार भागातील शिंदोडी या ठिकाणी रात्रीच्या वेळी दोन मुले रस्ता चुकल्याने हरवली होती. येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरुप त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यात आले.

पठारावरील शिंदोडी या गावांमध्ये रात्रीच्या वेळी आठ वाजता दोन लहान मुले अचानक रस्त्याच्या कडेला घाबरलेल्या स्थितीत रडत बसलेले दिसले. त्याचवेळी गावातील ग्रामस्थ पांडुरंग गायकवाड यांनी विचारपूस केली. अर्जुन दीपक पवार (वय ११) वर्षे व अरुण दशरथ बर्डे (वय ९) असुन आम्ही स्थापलिंग खंडोबा या ठिकाणी निघालो आहे. आम्हाला तिथे सोडा. असे त्या मुलांनी सांगितले.

परंतु वरवंडीत त्यांची कुठलीही ओळख पोहोचली नाही. म्हणून वरवंडीतील सागर शिंदे यांनी पंचक्रोशीतील सर्व व्हाट्सअप ग्रुपवर व माहिती असलेल्या सर्व वस्त्यांमध्ये या मुलांचे फोटो पाठवले. त्याचप्रमाणे खांबा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत आहेर यांनी देखील त्यांच्या संपर्कातील सर्व लोकांना कळवले . यानंतर रात्री बाराच्या सुमारास या मुलांची ओळख पटली. त्यांचे काका म्हैसगाव या ठिकाणचे आहे असे कळताच यांच्याशी सादर शिंदे यांनी संपर्क केला.

त्यांच्या आई-वडिलांनी सांगितले की, आम्ही शिरुर तालुक्यातील काठापुर या ठिकाणचे रहिवासी असून मुले सकाळी घराबाहेर पडली व गायबच झाली. आम्ही त्यांना सर्वत्र शोधत होतो. पण ते सापडले नसल्याने आम्ही धास्तावुन गेलो होतो. मुलांना बघताच आईच्या चेहऱ्यावर आनंद व डोळ्यात आनंदाश्रू आले त्यांनी शिदोंडी ग्रामस्थांची कृतज्ञता व्यक्त केली. काही दिवसांपासून या गावाच्या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सागर शिंदे, चंद्रकांत आहेर, वरवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बकुळे, भाऊसाहेब माकरे, संतोष बर्डे, पांडुरंग गायकवाड, काशिनाथ पवार, संतोष गायकवाड, राहुल बर्डे यावेळी उपस्थित होते.

