संगमनेर शहरातील दिल्ली नाका येथे अतिक्रमण विभागाची खुनशी कारवाई ;  शहरातील इतर अतिक्रमण जैसे थे !

केवळ एकाच ठिकाणी कारवाई – शहरातील इतर अतिक्रमणे काढणार कोण ? संतप्त नागरिकांचा सवाल

दि. 18

शहर प्रतिनिधी – मोहसीन रशीद शेख

संगमनेर शहरात नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागच्या अतिक्रमण पथकाने मोठा गाजावाजा करत शहरातील जोर्वे नाका ते दिल्लीनाका या भागात अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली. कारवाई करत असतांना अतिक्रमण विरोधी पथकाने आपले परस्पर हितसंबंध जोपासत, गरीब – श्रीमंत असा भेदभाव करत ही कारवाई केली. तर काही भागात पूर्वग्रहाने दूषित होऊन खुनशी कारवाई केली असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

जोर्वे नाका ते तिन बत्ती या भागातील अतिक्रमण थातुर मातुर कारवाई करत केवळ दोन तासांत काढले गेले. अतिक्रमण विरोधी पथक दिल्ली नाका या ठिकाणी आल्यानंतर तेथील कारवाई तब्बल दोन दिवस चालली. त्यामुळे बाकीकडचे अतिक्रमण केवळ दिखावा होते. मुख्य म्हणजे अतिक्रमण विभागाला कुणाच्या तरी आदेशाने निव्वळ खुन्नस म्हणून दिल्ली नाका येथील अतिक्रमण तोडायचे होते अशी चर्चा आता शहरात सुरु आहे.

संगमनेर शहरात अतिक्रमण विरोधी पथकाने ज्याप्रमाणे गाजावाजा केला होता त्या प्रमाणे अतिक्रमण काढण्यासाठी हे विभाग सपशेल फेल ठरले आहे. अतिक्रमण काढून रस्ता मोठा होईल व शुशोभीकरण होईल या आशेने दुकानदार व स्थानिक नागरिकांत आनंदाचे वातावरण होते. परंतु या पथकाने इतर ठिकाणी थातुर मातुर कारवाई करत एकाच ठिकाणी खुनशी कारवाई केल्याने नागरिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. आता शहरातील इतर ठिकाणची अतिक्रमणे काढणार कोण किंवा बाकीच्या ठिकाणी अतिक्रमणे नाहीत का असा सवाल जनता विचारत आहे.

एकतर्फी कारवाईने अतिक्रमण विभाग सोशल मीडियावर ट्रोल –

अतिक्रमण विभागाने कितीही गाजवला केलेला असता तरी केवळ कुणाच्या तरी सांगण्यावरून ही कारवाई केलेली असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. दिल्ली नाका येथे मागील काही घटनांची पार्श्वभूमी पाहता ही कारवाई केवळ आणि केवळ कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेली दिसते. अतिक्रमण पथक हे केवळ सांगकाम्या पथक आहे. असाही आरोप सोशल मीडियावर होतांना दिसत आहे.

अनधिकृत देशी दारू दुकानाची जोरदार चर्चा 

दिल्ली नाका येथे अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई केली त्याच नाक्याच्या परिसरात एक अनधिकृत देशी दारूचे दुकान अनेक वर्षांपासून सुरु आहे. याकडे नगरपालिका प्रशासन, पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे साफ दुर्लक्ष आहे. अनधिकृत जागेत हे दारूचे दुकान चालते कसे, या दुकानाला अधिकृत बांधकाम असलेला ना हरकत दाखल मिळाला कसा, कुणाच्या आशीर्वादाने हे दुकान सुरु आहे असे अनेक सवाल नागरिक विचारत आहेत. एकीकडे त्याच दुकानाच्या आजूबाजूचे अतिक्रमण काढत असतांना काही अतिक्रमण विरोधी पथकातील काही कर्मचारी या दुकान चालकाशी हितगुज करत होते. तब्बल दोन दिवस कारवाई चालली असतांना सुद्धा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक या कुणाचेही लक्ष या दुकानाकडे गेले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या बनोबी शेख यांनी ही बाब प्रशासनाच्या नजरेस आणून देत अनधिकृत दुकान बंद करून दुकान चालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असून तसे न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!