महायुतीच्या रवी राणांच्या वक्तव्याचा संगमनेर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध

योजनांसाठीचे पैसे जनतेचे आहेत, महायुतीचे नाही — दुर्गाताई तांबे

महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला लाचार होणार नाहीत…

प्रतिनिधी —

महाराष्ट्राला संत व समाज सुधारकांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात कायम महिलांचा सन्मान केला जातो. मात्र महायुती सरकारने मते खरेदी करण्याच्या नावावर महिला भगिनींचा स्वाभिमान दुखावला असून महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला कधीही लाचार होणार नाहीत. सरकारच्या घोषणासाठी लागणारा पैसा हा जनतेचा आहे. महायुतीचा नाही. रवी राणांसह महायुती सरकारने महिलांची माफी मागावी अशी मागणी दुर्गाताई तांबे यांनी केली आहे.

संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने रवी राणा यांचा निषेध करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, अर्चना बालोडे, पद्मा थोरात, मीनाक्षी थोरात, प्रमिला अभंग, दिपाली वर्पे, मीना थेटे, प्राजक्ता घुले, शितल उगलमुगले, ओमकार बिडवे, शुभम घुले, जावेद शेख, तानाजी शिरतार, आनंद वर्पे , मीराताई शेटे ,बेबीताई थोरात, निर्मला राऊत, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, एकनाथ श्रीपाद, अलोक बर्डे, अमित गुंजाळ आदींसह युवा काँग्रेस व महिला काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, महाराष्ट्राला थोर समाज सुधारक आणि संतांची परंपरा आहे महिलांचा सन्मान होणाऱ्या या महाराष्ट्रात महायुतीने महिलांचा अपमान केला आहे. पंधराशे रुपये महिला भगिनींसाठी देतात हे पैसे महायुतीची नसून जनतेच्या कष्टाचे आहेत. निवडणुका जवळ आल्याने अनेक फसव्या घोषणा केल्या जात आहेत. पैसे परत करण्याची बेताल वक्तव्य सत्ताधारी आमदार करत आहेत व त्याच वेळी व्यासपीठावर सर्व मंत्री उपस्थित आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यांच्या मनातील आता ओठावर येऊ लागले आहे. राणा दांपत्य हे प्रसिद्धीसाठी नेहमी अशी बेताल वक्तव्य करत असतात.

राज्यात प्रचंड महागाई वाढली आहे. भाजीपाला महाग झाला आहे. बेरोजगारी वाढली आहे. या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष वळवण्यासाठी अमिष दाखवली जात आहेत. हे गलिच्छ राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे. या वक्तव्याचा सर्व महिला भगिनी तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व स्वाभिमानी महिलांची माफी मागावी अशी मागणी ही त्यांनी केली

यावेळी सुरेश झावरे, दिपाली वर्पे, शुभम शिंदे, अमित गुंजाळ, अर्चना बलोडे, पद्मा थोरात, ऋतिक राऊत यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी काँग्रेसच्या वतीने महायुती सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

राणांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान – डॉ.थोरात

निवडणुका जवळ आल्याने महायुती सरकारने अनेक फसव्या घोषणा केल्या आहेत. रवी राणांसह इतर आमदारही मते न दिल्यास पैसे परत घेऊ अशी बेताल वक्तव्य करत आहेत. लोकशाहीमध्ये उघड उघड मते खरेदी करण्याचा हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामुळे महाराष्ट्रातील स्वाभिमानी महिला भगिनींचा अपमान झाला असून या वक्तव्याचा तीव्र निषेध करत असल्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!