शालेय शिष्यवृत्ती परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षांचा पाया — तहसीलदार सिद्धार्थ मोरे
प्रतिनिधी —
शिष्यवृत्ती परीक्षा ह्या स्पर्धा परीक्षांचा पाया असून जीवनात प्रशासकीय क्षेत्रात अधिकारी होण्यासाठी या परीक्षा अतिशय महत्त्वाच्या आहेत. कळस शाळेचे यश हे उत्तुंग असून यातून भावी पिढीचे अधिकारी घडतील असे प्रतिपादन अकोल्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (कळस बुद्रुक) यांचे आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आल्या बद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मोरे बोलत होते. पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, कळस सोसायटीचे चेअरमन विनय वाकचौरे, जयकिसान दूध संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब वाकचौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ईश्वर वाकचौरे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नामदेव निसाळ, तलाठी सागर लांडे, कामगार पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, डि.टी. वाकचौरे, भाऊसाहेब वाकचौरे, दीपक वाकचौरे आदि उपस्थित होते.

अधिकारी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जीवनात संस्काराला पण महत्व दिले पाहिजे. संस्कारातून विद्यार्थी घडले पाहिजेत. अशी संस्कारक्षम पिढी घडवण्याचं काम कळस शाळेमध्ये होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. येथील शिक्षक मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देत आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे असेही मोरे म्हणाले.

गुलाबराव पाटील यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे विद्यार्थी वेदिका विवेक वाकचौरे, ज्ञानदा प्रशांत वाकचौरे, अरुंधती सुहास कातोरे, गौरी विष्णू वाकचौरे ,पूर्वा विकास वाकचौरे, विराज जयराम वाकचौरे, यश योगेश वाकचौरे, ईश्वरी प्रशांत हुजबंद हे विद्यार्थी व मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिक सुवर्णा जाधव मोहिते, संपत भोर यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता दिघे यांनी तर आभार सपना पांडे यांनी मानले.
