दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी —
जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून, बचत गटातून महिला सबलीकरणाचे काम व दंडकारण्य अभियानातून वृक्षरोपण व संवर्धन संस्कृती वाढवणाऱ्या स्वच्छ, सुंदर आणि हरित संगमनेरचा वसा घेतलेल्या नगरपालिकेच्या पहिल्या महिला नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पुणतांबा येथे श्री.मुक्ताई ज्ञानपीठ व श्रीक्षेत्र पुणतांबा यांच्यावतीने स्व.सौ चंद्रभागाबाई राघोजी बुधवंत यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श मातोश्री जीवनगौरव पुरस्कार महंत स्वामी रामानंद गिरीजी महाराज व महंत प्रकाश आनंद गिरी महाराज श्रीक्षेत्र देवगड यांच्या हस्ते दुर्गाताई तांबे यांना कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.

दुर्गाताई तांबे यांनी जय हिंद महिला मंच मधून महिला सबलीकरणाबरोबरच खेडोपाड्यातील महिलांचे संघटन करून महिलांचे आरोग्य, आदिवासी महिला, अपंग, मूकबधिर, गोरगरीब यांच्यासाठी सातत्याने मोठे काम केले आहे. याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान गावोगावी राबविले.

संगमनेर तालुक्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संस्कृती वाढवताना संगमनेर शहरांमध्ये २५ गार्डनच्या निर्मिती बरोबर रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून हरित व स्वच्छ संगमनेरचा वसा घेतला आहे. नगराध्यक्ष म्हणून काम करताना संगमनेरकरांना अत्याधुनिक सुविधा देताना नगरपरिषदेला राज्य व राष्ट्रीय पातळीवर स्वच्छतेचे सातत्याने विविध पुरस्कार मिळवून दिले आहेत.

समाजकार्यात सक्रिय असताना आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना आमदार थोरात व आमदार तांबे यांचा स्नेह परिवार नातेवाईक कार्यकर्ते तालुक्यातील सर्वजण या सर्वांचे आदर तिथ्य सांभाळले आहे. मुलगा सत्यजित तांबे हे विधान परिषदेचे आमदार असून डॉ.हर्षल तांबे हे एसएमबीटी चे काम अत्यंत सक्षमपणे सांभाळत आहेत. समाजकारण राजकारण पर्यावरण याचबरोबर साहित्य क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले आहे. उत्तर महाराष्ट्रातील साहित्यप्रेमी कवयित्री म्हणून त्यांची ओळख असून अविश्रांत कामांची परंपरा त्यांनी सांभाळली आहे. त्यांना यापूर्वीही राज्यपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी तांबे म्हणाल्या की, हा पुरस्कार काम करण्यास आणखी ऊर्जा देणार आहे. समाजातील गरीबातला गरीब माणूस समृद्ध व्हावा यासाठी आपले काम सदैव सुरू राहणार असून सर्वांचे आशीर्वाद हाच मोठा ठेवा असल्याचा त्या म्हणाल्या. तांबे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संगमनेर शहर व तालुक्यातील विविध मान्यवर आणि नागरिकांमधून अभिनंदन केले जात आहे.
