प्रचंड फौज फाट्यासह संगमनेरात पोलिसी खाक्या सुरू सोबतीला आरटीओ !
प्रतिनिधी —
संगमनेर शहरात गेल्या महिनाभरापासून विविध घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमध्ये पोलीस प्रशासनाची चांगली तारांबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या अर्जांची दखल घेत प्रचंड फौज फाट्यासह पोलिसी कारवाईचा खाक्या सुरू केला असून त्यांच्या मदतीला आरटीओ विभाग सुद्धा धावून आला आहे. त्यामुळे आता संगमनेरात अवैध उद्योग करणाऱ्यांची खैर नाही असे चित्र निदान आठवडाभर तरी पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र काय परिस्थिती राहील हे पोलिसांनाच ठाऊक..

संगमनेर शहरात पोलीस विभागाकडून मंगळवारी सकाळपासून विविध कारवाया करण्यात आल्या. त्यामध्ये पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी दरम्यान कारवाई करण्यात आल्या. आरटीओ विभागाच्या वतीने देखील अवैध वाहनांवर कारवाया करण्यात आल्या त्यात रिक्षांवर कारवाई करण्याचे प्रमाण अधिक आहे.

दिवसभर शहरातील जोर्वे नाका, दिल्ली नाका तसेच बस स्थानक अशा तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होटी. यामध्ये मोटार वाहन कायद्या नुसार 64 वाहनधारकांवर कारवाया करण्यात आल्या. याशिवाय संगमनेर शहरातील जुना महामार्ग, मुख्य बाजारपेठ या भागामध्ये ज्या दुकानदारांनी दुकानाच्या पुढील भागात अतिक्रमण केलेले आढळून आले त्या ठिकाणी सुद्धा कारवाई करण्यात आली. त्यासाठी दोन पथके नेमण्यात आली होती. एकूण 35 दुकानदारांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 102, 117 खाली कारवाई करण्यात आली असून या सर्व कारवायांचे प्रस्ताव न्यायालयामध्ये पाठविण्यात आले आहेत.

संगमनेर शहर पोलीस विभाग आणि आरटीओ यांच्या संयुक्त पथकाने कागदपत्रे नसणाऱ्या रिक्षांवर देखील कारवाई केली. यामध्ये कागदपत्रे नसणाऱ्या 15 रिक्षा जप्त करण्यात आल्या असून अन्य 21 रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून 1 लाख 72 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना ग्रामीण भागातील नागरिकांनी तक्रार अर्ज दिला होता. त्या अर्जामध्ये जोर्वे, सुकेवाडी, निळवंडे, पिंपरणे, कनोली, वडगाव पान, कोल्हेवाडी इत्यादी भागात विनापरवाना रिक्षा व वाहने फिरत असतात त्यावर आरटीओ मार्फत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. तसेच संगमनेर शहर व परिसरात अशा विनापरवाना रिक्षा या अवैध वाळू वाहतूक, गोमांस वाहतुकीसाठी वापरल्या जातात अशी तक्रार देखील सातत्याने प्राप्त होत होत्या.

यातून भविष्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा रोष होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी आरटीओ विभागाच्या पथकाकडून संगमनेर शहरात विशेषतः बस स्थानक ते ज्ञानमाता विद्यालय, तीन बत्ती चौक ते रायतेवाडी फाटा, कोल्हेवाडी रोड, जोर्वे रोड, जमजम कॉलनी, भारत नगर, रहेमत नगर, मदिना नगर इत्यादी भागात कारवाई करावी आणि या कारवाई करता मदतीला आवश्यक ते मनुष्यबळ हे संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल असे पत्र पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी निरीक्षक उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, श्रीरामपूर यांना दिले आहे.

वरील सर्व प्रकारच्या कारवाया पाहता आणि पोलीस विभागाने सुरू केलेली पोलिसिंग पाहता भविष्यात संगमनेर शहरातून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन होण्याची शक्यता वर्तवली जात असून अवैध धंदे एकदाचे कायमस्वरूपी कधी बंद होतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
