अगामी पिढीमध्ये लोकशाही मूल्ये रुजली पाहिजेत — डॉ. सुधीर तांबे

प्रतिनिधी —

समाज कोणताही असो त्या समाजाचे उत्थापन ही काळाची गरज आहे. हे उत्थापन शिक्षण आणि व्यावसायिक दृष्टीकोन यामुळेच टप्प्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक भावना रुजल्यास लोकशाही प्रगल्भ होईल. म्हणूनच शालेय जीवनापासून सकारात्मक दृष्टिकोन तयार करुन निखळ लोकशाहीची मूल्ये रुजवण्यासाठी सुरुवात करणे हे अगत्याचे असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या सर्वपंथीय जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

ख्रिस्ती समाजातील विविध क्षेत्रातील नामवंतांच्या आयोजित बैठकीमध्ये परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, फा. नेल्सन परेरा, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माध्यम सल्लागार प्रमुख सॉलोमन गायकवाड, पा. सतीश अल्हाट, सुनील उबाळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब नेटके आदींनी मनोगत व्यक्त केले

डॉ. तांबे पुढे म्हणाले की, जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून लोकांचे, विशेषतः तरुणांचे प्रबोधन, तसेच समाजातील विचारवंतांनी आणि सकारात्मक भावना जपणारांनी लोकांमध्ये जाऊन लोकशाहीची मूल्ये रुजवली पाहिजेत. सद्य स्थितीत याप्रकारे कोणी प्रबोधन करीत नसल्यामुळे नवपीढीत या विषयात समाधानकारक गतीचा अभाव दिसतो. तोच या प्रयत्नातून दूर करायचा आहे. म्हणजे येथून पुढे येणाऱ्या पिढीमध्ये खऱ्या लोकशाहीचे मूळ रुजून भविष्यात सशक्त लोकशाही लोककल्याण करील.

सकारात्मक भावनेमुळे निराशाजनक विचारांना मूठमाती मिळेल. एक चांगली पिढी घडल्याचे पुण्य आपल्या पदरी पडेल. हे करत असतानाच शिक्षणाची टक्केवारी वाढवणे, व्यावसायिक दृष्टीकोन विकसीत करणे हे काम केल्यास एक नवचैतन्यही निर्माण होईल. विविध शासकीय योजना आणि लाभ यांचा यथार्थतेने वापर होण्यास मदत होईल. ख्रिस्ती विकास परिषदेच्या कार्याचे ही त्यांनी यावेळी कौतुक केले.

याप्रसंगी प्रताप देवरे, डॉ. स्वप्नील भांबळ, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, विलास शेळके, सुधीर ब्रम्हे, प्रतीक पठारे, प्रमोद संसारे, सचिन मुंतोडे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!