घारगांव पोलिसांची भूमिका आणि तपासाबाबत अनेक शंका, तक्रारी आणि आरोप…

उत्तम कुऱ्हाडे यांचा प्रॉपर्टी साठी झाला खून ;

पोलिसांकडून निर्दोष नातेवाईकांना दिला जातोय त्रास — भागाजी आवटे यांचा आरोप

फसवणूक करून घारगाव पोलिसांनी केली लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी..

मयताच्या बँक खात्यातील लाखो रुपये गायब ?

विशेष प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वृद्ध व्यक्तीच्या खून प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटले असून या गुन्ह्यात अद्याप खुनी सापडलेला नसताना पोलिसांकडून मयताच्या नातेवाईकांची चौकशी आणि त्यांना त्रास देण्याचे काम चालू असल्याचा आरोप मयताचे मावसभाऊ भागाजी आवटे यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास संशयास्पद असून ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचे काम चालू आहे. मयताचा खून हा जमीन आणि प्रॉपर्टी साठी झाला असल्याचा आरोप देखील आवटे यांनी केला आहे.

एप्रिल २०२३ मध्ये घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडदरा, केळेवाडी (बोटा) या शिवारात उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय ६३) यांची धारदार हत्याराने वार करून खून करण्याची घटना घडली होती. घटना घडल्यानंतर सुरुवातीला मयतावर जंगली प्राण्याने हल्ला करून जखमी केल्याने मृत्यू आला असावा अशी अफवा पसरवण्यात आली होती. परंतु संगमनेर वनविभाग यांनी यासंदर्भात अहवाल देऊन कुठल्याही जंगली प्राण्या पासून मृत्यू झाल्या नसल्याचे स्पष्ट केले. तर पोस्टमार्टम नंतर वैद्यकीय तपासणीत धारदार शस्त्राने हृदयावर आणि फुफ्फुसावर जखमा झाल्याने मृत्यू झाला असल्याचे उघडकीस आले.

पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. नंतर पोलीस नाईक एकनाथ लांघे यांनी फिर्याद दिल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर हे स्वतः करीत आहेत. घटना घडून गेल्यानंतर सहा महिने झाले तरीही अद्याप पर्यंत खुनी मात्र सापडलेला नाही.

परंतु पोलिसांनी तपास करण्यासाठी मयताचे नातेवाईक आणि इतर नऊ संशयतांची लाय डिटेक्टर चाचणी (पॉलीग्राफ) केली असल्याचे उघडकीस आले आहे. या चाचणीमध्ये मयताचे मावसभाऊ भागाजी आवटे व त्यांची पत्नी यांची देखील लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली. सुमारे चार ते पाच वेळा पोलीस ठाण्यात त्यांना बोलवून त्रास देण्यात आला असल्याचा आरोप आवटे यांनी केला आहे.

आमचा कसलाही संबंध नसताना पोलिसांनी आमची फसवणूक करून, आरोपी करण्याची भीती दाखवून, आमच्या सह्या घेऊन आम्हाला मुंबई येथे पाठवून आमची ही चाचणी केली. शिवाय मुंबई येथे जाण्याचा खर्च आम्हालाच करायला लावला. या चाचणीमध्ये काहीही आढळून आलेले नाही. असे असताना पोलीस आम्हाला नाहक त्रास कशासाठी देतात असाही सवाल आवटे यांनी केला आहे. आता या प्रकरणाची आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे आवटे यांनी सांगितले.

मयत उत्तम कुऱ्हाडे हे आवटे यांचे मावसबंधू होते. त्यांनी महानुभाव पंथाची दीक्षा घेतली होती. त्यांची सुमारे दीड कोटी रुपयांची प्रॉपर्टी जमीन जुमला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रॉपर्टी साठी त्यांचा खून झाला आहे असा आरोप भागाजी आवटे यांनी केला आहे. त्यामुळे या प्रॉपर्टीच्या संदर्भाने पूर्वी काही वाद झाले असतील त्यांची पण त्यात चौकशी होणे गरजेचे आहे.

तसेच मयताच्या नावावर बँकेमध्ये ४० लाख रुपये असल्याची माहिती मला मिळाली. पोलीस अधिकारी मात्र २७ लाख रुपये असल्याचे सांगतात. याबद्दल देखील मला संशय असून या पैशांचे काय झाले असा प्रश्न आवटे यांनी उपस्थीत केला आहे. पोलिसांचा तपास हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालू असून खऱ्या खुन्याला शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत नसल्याचे माझे स्पष्ट मत आहे असे आवटे यांनी सांगितले. एकंदरीत पाहता पोलिसांनी चालवलेला तपास हा ‘चोर सोडून संन्यासाला फाशी’ असाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे.

लाय डिटेक्टर चाचणीला पोलीस निरीक्षक खेडकर यांचा दुजोरा !

उत्तम कुऱ्हाडे यांच्या खुनाच्या तपासाबाबत संशयीतांची लाय डिटेक्टर चाचणी करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक तपास अधिकारी संतोष खेडकर यांनी सांगितले आहे. या प्रकरणात अनेकांची चौकशी केली आहे. लाय डिटेक्टर चाचणी केली आहे, मात्र अद्याप काहीही हाताशी लागलेले नसून तपास चालू आहे. या प्रकरणात कोणालाही अटक केलेली नाही. असेही त्यांनी म्हटले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!