गणेशच्या कामगारांना अर्थकारण आणि राजकारणात ओढू नका — कैलास तांबे
करारातील अर्थिक व्यवहाराची आधी पूर्तता करा !
प्रतिनिधी —
पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने केलेल्या सहकार्याची जाणीव गणेशच्या कामगारांना आहे. त्यामुळे कामगारांना राजकारणात आणि अर्थकराणात न ओढता कराराप्रमाणे सर्व अर्थिक व्यवहार गणेश कारखान्याने आधी पूर्ण करावेत असे आवाहन पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात तांबे म्हणाले आहेत की, डॉ. विखे पाटील कारखना आणि गणेश कारखान्यात झालेल्या पाच वर्षातील झालेल्या कराराच्या बाबतीत लवादापुढे काही निर्णय व्हायचे आहेत. याबाबत असलेले अर्थिक मुद्दे निकाली निघावेत हा प्रयत्न आहे. कारण ज्यांनी यापुर्वी कामगारांचे पैसे बुडवले ते विखे पाटील कारखान्याचे पैसे बुडविण्यासही मागे पुढे पाहाणार नाहीत. त्यामुळे झालेल्या कराराप्रमाणे गणेशच्या संचालकांनी आधी व्यवहार पूर्ण करावेत. यासाठी डॉ. विखे पाटील कारखान्याने पत्र दिले आहेत. त्यामुळे गणेश कारखान्याचे कर्ज प्रकरण बॅकेने थांबवावे किंवा कर्ज प्रकरणाला विखे कारखान्याची हरकत असण्याचे कोणतेही कारण नाही. गणेश कारखान्याला संगमनेर आणि संजीवनीचे नेते मदत करणार असल्याचे संचालक मंडळाकडून सांगितले जात असेल तर गणेश कारखान्याला कर्ज काढण्याची गरज काय असा प्रश्न तांबे यांनी उपस्थित केला.

गणेश कारखाना आठ वर्ष चालविताना एकाही कामगाराचा पगार डॉ. विखे पाटील कारखान्याने थकविलेला नाही. उलट पुर्वीच्या संचालक मंडळाने थकविलेले २७ महीन्यांचे पगार विखे कारखान्याने केले. याची जाणीव कामगारांना आहे. याकडे लक्ष वेधून तांबे यांनी पत्रकात म्हटले आहे की, पाच वर्षाच्या कराराची मुदत वाढवून मिळाली असताना सुध्दा निवडणुकी नंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या मनाने गणेश कारखान्याचा करार रद्द करून आम्हाला कारखाना चालवायचा नाही ही भूमिका घेतली. त्यांंतनंतर सर्व अर्थिक व्यवहार गणेशच्या संचालकांनी पूर्ण करायला हवे होते. परंतू त्याचा कोणाताही ठराव न करता केवळ विखे पाटील यांना बदनाम करण्याचा डाव संचालक मंडळाचा दिसतो हे कामगार आणि सभासदांनी लक्षात घेतले पाहीजे.

डॉ. विखे पाटील कारखान्याशी असलेला करार अद्यापही रद्द नाही. त्यामुळे गणेश कारखाना कर्ज कोणाच्या नावाने घेणार याची कोणती स्पष्टता कराखान्याचे संचालक करायला तयार नाहीत. यापुर्वी डॉ. विखे कारखान्याने तोटा सहन करून गणेश कारखाना चालवला सभासद कामगारांचे हित जोपासले आहे. आता कारखाना चालविण्यात येत असलेले संचालकांचे अपयश उघड होवू लागल्याने कामगारांचा उपयोग करून संचालकांना राजकारण करणे सुचले हे अत्यंत दुर्दैवी आहे. परंतू या अर्थकारणात आणि राजकारणात कामगारांना ओढू नये. उलट संगमनेर आणि संजीवनीच्या मार्गदर्शकांकडे कर्ज काढून गणेश कारखाना चालविण्याचा आणि पगार करण्याचा आग्रह कामगारांनी धरावा असे आवाहन तांबे यांनी पत्रकात केले आहे.

