संगमनेर फेस्टिव्हल
सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाने संगमनेरकर खुश !
प्रतिनिधी —
मनामनात असलेली गाणी.. सुंदर आवाजातून सादर होणार्या एकामागून हिंदी, चित्रपटगीतांपासून ते अलिकडच्या काळात तरुणाईत प्रचंड गाजलेली सुफी गाणी व रिमिक्स.. निवेदन आणि बहारदार संगीताने संगमनेर फेस्टिव्हलचा दुसरा दिवस गाजला. विविध दूरचित्र वाहिन्यांवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांच्या गाण्यांच्या मैफीलीने संगमनेरकर रसिकांना खुश केले.

राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या दुसर्या दिवशी अध्यक्ष मनिष मालपाणी, सीए कैलास सोमाणी, राणीप्रसाद मुंदडा, सोनु राजपाल, नवनीत कोठारी, सत्यम वारे, राजकुमार गांधी, अजित भोत आदींच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली.

पार्श्वगायक चैतन्य कुलकर्णी याच्यासह गौरी गोसावी, रवींद्र खोमने व श्रावणी महाजन यांनी झी, सोनी आणि स्टार या वाहिन्यांवरील विविध कार्यक्रमांतून आपली प्रतिभा ठळकपणे उमटविली आहे. या तरुण गायकांच्या सुमधूर आवाजातील नव्या-जून्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित असलेला ‘द बेस्ट ऑफ बॉलीवूड लाईव्ह’ हा बहारदार कार्यक्रम ऐकण्याची व पाहण्याची संधी संगमनेरकरांना मिळाली. तुडूंब भरलेल्या प्रेक्षागारासह रिमझीम कोसळणार्या पावसाच्या साक्षीने सुरु झालेल्या या कार्यक्रमाने एकामागून एक गाजलेली गाणी सादर करीत उपस्थितांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायक रवींद्र खोमने यांनी गणेश वंदना सादर केली. त्यानंतर पार्श्वगायीका गौरी गोसावी यांनी सादर केलेल्या सुफी गीताने उपस्थितांमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा अक्षरशः पाऊस पाडला. सूत्रसंचालकाच्या निवेदनातून सादर होणार्या प्रत्येक गीताचा इतिहास उलगडला. चैतन्य कुलकर्णी याने सादर केलेल्या सुफी-हिंदी-पंजाबी रिमिक्स गीताच्या तालावर तर अक्षरशः उपस्थितांना जागेवरच उभे राहून डोलायलाही लावले.

