सलग सुट्ट्यांमुळे भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची तुफान गर्दी !
प्रतिनिधी —
यावर्षी सलग सुट्ट्या जोडून आल्याने पर्यटकांची पंढरी असलेल्या भंडारदरा धरण परिसरात भटकंती करण्यासाठी विविध शहरातून आलेल्या पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. साधारण १० ते १५ हजार पर्यटकांनी भंडारदरा परिसरत हजेरी लावली.

हरिश्चंद्रगड अभयारण्यसह हरिश्चंद्रगड’ रतनगड व कळसुबाई गडावरही तुफान गर्दी झाली होती. गडावर जाण्यासाठी मुंबई, पुणे येथील पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. तसेच रंधा धबधबा परिसरात गर्दी ओसंडून वाहत होती. स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा धरण, रंधा धबधबा, धबधबा, कोकणकडा, हरिश्चंद्र गड, कळसुबाई शिखर, रतनगड, अमृतेश्वर मंदीर रतनवाडी, सांदण दरी या प्रेक्षणीय स्थळी पुणे, नाशिक, ठाणे, मुंबई आणि नगर जिल्हयातून मोठया प्रमणात पर्यटकानी गर्दी केली होती.

पावसामुळे रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत. रस्ते अरुंद असल्यामुळे वाहतुक कोंडी होवून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरीता वाहतूक नियमात बदल करण्यात आले होते. साधारण २० – २५ पोलीस कर्मचारी सुरक्षे साठी तैनात करण्यात आले होते. रंधा फाटा येथून भंडारदरा येथे जाण्यासाठी थेट प्रवेश बंद करण्यात आला. शेंडी / भंडारदरा येथे जाण्यासाठी वाकी फाटा, वारंघूशी फाटा येथून एकेरी मार्गावरून प्रवेश देण्यात आला होता. एकेरी वाहतुकीचा मार्ग वारंघुशी फाटा – वाकी फाटा – चिचोंडी फाटा, यश रिसोर्ट- शेंडी भंडारदरा धरण – स्पिल वे गेट – भंडारदरा गाव गुहीरे – रंधा मार्गे इच्छित स्थळी जाण्यासाठी मार्ग केला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दात्रे, उपनिरीक्षक जी एफ शेख, विजय फटांगरे, डगळे, अशोक गाडे, येवले यांच्या सह सर्व पोलीस कर्मचारी विशेष लक्ष ठेऊन होते. तसेच चेक पोस्ट वर पर्यटकांजवळ वाहनांमध्ये दारू सापडली तर ती ओतून दिली जात होती.

