मणिपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ संगमनेरला २८ जुलै रोजी शांती मोर्चा !

प्रतिनिधी —

मणिपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या आणि स्त्रियांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर येथे २८ जुलै रोजी ‘शांती मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती समाजवादी जनपरिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली आहे.

मणिपूर येथील हिंसाचाराने आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरीक अस्वस्थ झाले आहेत. गेले ८४ दिवस मणिपूर अशांत आहे. केंद्र व राज्यसरकार मणिपूर मध्ये शांतता निर्माण करु शकलेले नाहीं. सरकारने तेथील इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे दहशत वाढली आहे. सुमारे साठ हजार नागरिक बेघर झाले आहेत.१५०स्त्री पुरुष मारले गेले आहेत.

३ मे २०२३ रोजी दोन महिलांना विवस्त्र करून त्याची धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना मागील आठवड्यापर्यंत देशाला समजली नाही. सरकारने आरोपींवर कारवाई केली नाही. बेटी बचाव, बेटी पढाव म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी या विषयावर मौन धारण केलेले होते. अत्याचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत होते.

सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर नरेंद्र मोदींनी या घटनेवर भाष्य केले. त्यात मणिपूर मधील हिंसाचाराचे गांभीर्य दुर्लक्षित करुन पंतप्रधानांनी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यातील हिंसक घटनांचा दाखला दिला. केंद्र व राज्य सरकारची भूमिका हिंसाचार करणाऱ्यांना समर्थन देणारी आहे. असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध जाहीर केला आहे. शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी संगमनेरच्या शांतता प्रिय स्त्री पुरुष नागरिकांचा ‘शांती मोर्चा’ आयोजित केल्याची महिती समाजवादी जन परिषदेच्या ॲड.निशा शिवूरकर आणि महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेच्या अनिल भोसले यांनी दिली आहे.

संगमनेर बस स्टँड जवळील दत्त मंदिरापासून दुपारी एक वाजता निघणाऱ्या या शांती मोर्चात नागरिकांनी मोठया संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन कारभारी देव्हारे, प्रा. शिवाजी गायकवाड, ॲड. ज्ञानदेव सहाणे, विनोद गायकवाड, दीपक कदम, बाबा खरात, बाबुराव गायकवाड, इंदुमती घुले इत्यादींनी केलें आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!