दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ पिंपळगाव येथील कनकेश्वर डोंगरावर तर चंदनापुरी घाट येथे आनंद मेळावा — दुर्गाताई तांबे
प्रतिनिधी —
आमदार बाळासाहेब थोरात व मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हरित सृष्टीसाठी काम करणारी दंडकारण्य अभियान ही पर्यावरण संवर्धनाची महाराष्ट्रातील मोठी लोकचळवळ ठरली असून या वर्षी दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ पिंपळगाव येथील कनकेश्वर डोंगरावर आहे. तर चंदनापुरी घाट येथे आनंद मेळावा होणार असल्याची माहिती दुर्गाताई तांबे यांनी दीली आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर विविध शासकीय विभाग व अमृत उद्योग समूहातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्य प्रवर्तक माजी आमदार डॉ सुधीर तांबे हे होते.

यावेळी बोलताना डॉ.तांबे म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियान हे सजीव सृष्टीला वरदान ठरणारे आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हिरवाईचा तालुका निर्माण करण्यासाठी मागील सोळा वर्षापासून काम होत आहे.तीस कोटी बिया व लाखो वृक्षांचे रोपण झाले आहे. पर्यावरण संवर्धन हे प्रत्येकाची मूलभूत कर्तव्य असून कोरोनाच्या संकटात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. हाच ऑक्सिजन आपल्याला आयुष्य भर देणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि संवर्धन प्रत्येकाने केलीच पाहिजे.

दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, वृक्षरोपण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने आपली वस्ती, गाव हिरवाईने नटेल यासाठी काम केले पाहिजे. मोकळ्या जागेत गायरान जमिनी यावर वृक्षारोपण करा. एक व्यक्ती एक झाड ही संकल्पना तालुक्यात राबवण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय व्हा.यावर्षी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर तालुक्यात २ हजार ५०० वटवृक्षांची रोपण करण्यात आले आहे. विविध सहकारी संस्थांनी वेगवेगळ्या डोंगरांवरती वृक्षारोपण करून त्याची जबाबदारी घेत हे डोंगर हिरवाईने फुलवूया असे आवाहन ही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ वर्पे यांनी केले तर जगन्नाथ घुगरकर यांनी आभार मानले.

