संगमनेर ‘भगवा’ मोर्चाला अद्याप परवानगी दिलेली नाही —  वाघचौरे 

गुन्हेगार आता तडीपार नाहीतर गजाआड…

प्रतिनिधी —

महाराष्ट्रात हिंदूंच्या सणांवर होणारे हल्ले, दिल्लीत साक्षीची जिहादींकडून चाकूने अनेक वार करून केलेली हत्या व जोर्वे (संगमनेर)  गावातील ८ हिंदू तरुणांवर तलवारीने झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवार दि.६ जून रोजी होणाऱ्या सकल हिंदु समाज ‘भगवा मोर्चा” ला आतापर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. अशी माहिती  संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हेदेखील उपस्थित होते.

कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भाने आज पोलीस उपअधीक्षकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

वाघचौरे म्हणाले की संगमनेर शहरातील शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. मोर्चासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेले नाही. संगमनेर बंदचे आवाहन कोणी केलेले नाही.

जोर्वे नाका प्रकरणी पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई केलेली आहे. अनेक आरोपींना अटक केली आहे आणि आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस कोणालाही पाठीशी घालणार नाहीत. तसेच संगमनेरात येथून पुढे गुन्हेगारांना एकतर तडीपार व्हावे लागेल, नाहीतर तुरुंगात गजाआड जावे लागेल अशा पद्धतीने पोलीस कारवाई होत राहणार आहे. असे त्यांनी ठामपणे सांगितले

व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम अशा विविध प्रकारच्या सोशल मीडिया वरून मोर्चाच्या संदर्भाने अथवा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पोस्ट पसरवणे, अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल. सायबर विभाग याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यामुळे व्हाट्सअप ग्रुपच्या सर्व ॲडमिन्सनी याची दखल घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. संगमनेर बंद करण्याचे आवाहन कोणीही केलेले नाही बळजबरीने बंद करणाऱ्यांवर कडक  कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!