पशुपालकांना मदत करणारे महाराष्‍ट्र एकमेव राज्य – पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील 

भेसळयुक्त दूध ही नगर जिल्ह्यातील मोठी समस्या

 प्रतिनिधी —

शेतकरी पशुधनाच्या बाबतीत राज्य सरकार अतिशय संवेदनशीलपणे निर्णय घेत आहे. गो आयोग स्‍थापन करण्‍यात आल्‍याने गोसंवर्धना बरोबरच दूग्‍ध व्‍यवसायाला संरक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी राज्‍य सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. शेतीपुरक व्‍यवसायातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्‍याचे सरकारचे उदिष्‍ठ असून, लम्पि संकटातही पशुधन वाचविण्‍यासाठी देशात पशुपालकांना मदत करणारे महाराष्‍ट्र हे एकमेव राज्य असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.

राज्यशासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाच्या वतीने शिर्डी येथे आयोजित तीन दिवसीय ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे पशुसंवर्धन मंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री अब्दुल सत्तार होते.

विखे-पाटील म्हणाले की, शेतीला पुरक असा जोडधंदा म्हणून पशुधन व्यवसायाकडे पाहिले जाते. दूग्ध व कुक्कुटपालन व्यवसायाला नवीन दिशा मिळावी, नव-नवीन तंत्रज्ञानाचा पशुधन व्यवसायाला फायदा झाला पाहिजे. यासाठी ‘महापशुधन एक्स्पो’ आयोजित करण्यात आला आहे. शेळी-मेढी पालनाला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या महामंडळाचे राज्याचे मुख्यालय अहमदनगर असणार आहे. यासाठी वार्षिक दहा हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे‌. हा व्यवसाय करणाऱ्या तरूणांना १ लाख ७५ हजार रूपयांचे बिन व्याजी कर्ज दिले जाणार आहे‌. याचे केंद्रही नगर जिल्‍ह्यात उभारण्‍यात येणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

लम्पि संकटाचा अनुभव लक्षात घेवून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्‍या आवाहानाला प्रतिसाद म्‍हणून पशुधनाच्या लसीच्या निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठी पुण्यात ७० कोटी रूपये खर्चून प्रयोगशाळा उभारण्यात आली असून सप्टेंबर २०२३ पासून प्रत्यक्ष लसीच्या उत्पादनाला सुरूवात होणार आहे. यामुळे महाराष्ट्र देशाला लस पुरविणारे एकमेव राज्‍य ठरेल. कृत्रीम रेतन कार्यक्रमात बदल करून ९५ टक्के मादी पशुधन निर्माण होतील यासाठी पशुसंवर्धन विभागाचा प्रयत्न आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रीय शेतीचे महत्‍व आता आधोरेखित केले आहे. सेंद्रीय शेती आणि गोमातेचे संवर्धन करुनच आता कृषि क्षेत्रामध्‍ये प्रयोग करावे लागणार आहेत. यासाठी तरुण शेतकऱ्यांना आणि महिलांना मोठ्या संधी असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यापुढे सर्वात मोठे आवाहन दूध भेसळीचे आहे. असे स्पष्ट करत विखे-पाटील म्हणाले, नवीन कायदा आणून दूध भेसळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात येईल. तक्रारींसाठी टोल फ्री क्रमांक देण्यात येईल. यावर सर्वसामान्य नागरिकांनी तक्रारी नोंदवाव्यात. असे आवाहन ही पशुसंवर्धनमंत्र्यांनी केले. सावळीविहिर येथील शेती महामंडळाच्या जागेवर नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय बांधण्यात येईल. अशी घोषणा ही‌ विखे-पाटील यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाचे अध्‍यक्ष अब्‍दुल सत्‍तार यांनी महापशुधन एक्‍सपोच्‍या नियोजनाचे कौतुक करुन, मंत्री विखे पाटील यांचा कृषि क्षेत्रातील अनुभव खुप मोठा आहे. वेळोवेळी त्‍यांचे मार्गदर्शनही मला होते. राज्‍य सरकारने अतिवृष्‍टीमध्‍ये नुकसान झालेल्‍या शेतक-यांना मदत दिली असून, एक रुपयांत विमा योजनाही सुरु केली आहे. किसान सन्‍मान योजनेतून शेतक-यांचा सन्‍मान वाढविण्‍याचा प्रयत्‍न सरकारचा असून, नगर जिल्‍ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात महिनाभराच्या आत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्यात येईल. अशी ग्वाही कृषीमंत्री‌ अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

‘महापशुधन एक्स्पो’ मध्ये ३०० स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. विविध प्रजातीचे पशुधन या ‘महापशुधन एक्सपो’ मध्ये सहभागी झाले आहेत. प्रदर्शनाच्‍या निमित्‍ताने शासनाच्‍या विविध योजनांची माहीती वेगवेगळ्या स्‍टॉलच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि पशुपालकांना मिळत आहे. विविध चर्चासत्रांसाठी स्‍वतंत्र दालनाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून, चारही कृषि विद्यापीठ तसेच नागपुर येथील मत्‍स विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थीही शेतक-यांना माहिती देवून मार्गदर्शन करीत आहेत.

खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ च्या आयोजना मागील भूमिका विशद करुन लम्पि संकटानंतर पशुसंवर्धन विभागाचा मोठा कार्यक्रम राज्‍यात प्रथमच होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्‍या योजनांची माहिती या प्रदर्शनातून निश्चित मिळेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांतकुमार पाटील, ‘महानंद’चे चेअरमन राजेश परजणे, जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे – पाटील, पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष अरुण मुंढे, राजेंद्र गोंदकर, शिवसेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष कमलाकर कोते, भाजपाचे सरचिटणीस नितीन दिनकर, कृषी विभागाचे आयुक्त सुशिलकुमार चव्हाण, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, अहमदनगर जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

यावेळी ‘पशुसंवर्धन दैनंदिनी’, ‘योजनांच्या घडी पुस्तिका’ व ‘सुलभ शेळीपालन’ या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शितलकुमार मुकणे यांनी केले. अहमदनगर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे‌ यांनी आभार व्यक्त केले. २५ व २६ मार्च २०२३ रोजी ‘महापशुधन एक्स्पो २०२३’ सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला असून याचा लाभ घ्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!