चंदनापुरी घाट ते पठार भागातील साकुर, वरुडी फाटा पर्यंत जोरदार गारपीट !
प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या चंदनापुरी घाटापासून ते पठार भागातील साकुर आणि वरुडी फाट्यापर्यंत आज दुपारी जोरदार गारपीट झाली आहे गारपीट आणि पाऊस यामुळे शेतीचे देखील नुकसान झाले आहे.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक या भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अचानक पावसाबरोबर गाराही पडू लागल्या. या गारा इतक्या मोठ्या प्रमाणावर पडल्या की काही काळ महामार्गावर स्नो फॉल झाल्यानंतर रस्त्यावर जसे बर्फ असते तसेच स्वरूप आले होते.

गारांचा सडा पुणे- नाशिक महामार्गावर पडला होता. काही काळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. या भागात टोमॅटो पिकाचे मोठे उत्पादन घेतले जाते. याच भागात ही प्रचंड गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाला गारपिटीचा मोठा फटका बसलाय.

अचानक वातावरणात बदल होऊन अर्ध्या तासाच्या आत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गारपिट झाली. गारपिटीचा इशारा दिला होता, तो अखेर तंतोतंत खरा झालाय. विदर्भातही मोठ्या प्रमाणावर शुक्रवारी गारपीट आणि पाऊस झाल्याने तेथील शेती पिकांचेही प्रचंड नुकसान झाल आहे. आज संगमनेर तालुक्याच्या पठार भागाला या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

