आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून व्यथित आहात का ? — विखे-पाटील
महसूल मंत्री विखे पाटील यांचा आमदार बाळासाहेब थोरात यांना सवाल
प्रतिनिधी —
पदवीधर निवडणुकीत कोणतीच भूमिका स्पष्ट न करणाऱ्या थोरातांनी काँग्रेस पक्षाला सोयी नूसार वापरण्यापेक्षा भूमिका स्पष्ट केली पाहीजे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला म्हणून तुम्ही व्यथित आहात का ? असा सवाल राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

महसूल मंत्री विखे पाटील यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाची भूमिका मांडा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा. असे थेट आव्हान देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, तुम्ही काँग्रेस पक्षाला सोयीनुसार वापरू शकत नाही. नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत मुळातः बाळासाहेब थोरात व्यथित झाले आहेत. त्यांच्या तालुक्यातील जनता त्यांना सोडून चालली आहे. त्यांच्या तालुक्यातील चार महत्वपूर्ण गावांच्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मोठे यश मिळाले त्यामुळेच थोरात व्यथित झाले असल्याचा टोला त्यांनी लगावला.

वाळू माफीयांवरील कारवाईचे राजकीय भांडवल करून तुम्ही जनतेला भावनिक साद घालत असाल तर जनता एवढी दूधखुळी नाही. आशा शब्दात विखे पाटील यांनी थोरातांच्या टिकेला उतर दिले.
वाळू माफिया आणि ठेकेदारांनी काढलेल्या मोर्चाला दवाखान्यात असतानाही फोनवरून तुम्ही मार्गदर्शन करता मग पदवीधर निवडणुकीत सुध्दा महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत भूमिका का स्पष्ट का केली नाही याबाबतही थोरातांनी बोलले पाहीजे असे विखे पाटील म्हणाले.

निवडणूक संपली; तांबेंचा विषय संपला
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणूकही संपली आहे. भाजपने दिलेल्या पाठींब्यामुळे निवडून आले. उद्याच्या काळात त्यांनी पक्षाच्या भूमिकेसोबत राहावे एवढीच आमची अपेक्षा आहे, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.

जितेंद्र आव्हाड यांना टोला
राष्ट्रवादीचे आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड हे सातत्याने आपली भूमिका स्पष्ट करीत असतात. ते शरद पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांनी मांडलेली भूमिका ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मान्य आहे का हे पण तपासून घेतले पाहिजे, असा उपरोधिक टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लगावला.
