कापूस वेचायला शेतात गेलेली अल्पवयीन मुलगी पळवून नेली !
संगमनेर तालुक्यातील घटना
प्रतिनिधी —
शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी कोपरगाव येथील एकाने पळवून नेण्याची घटना संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात घडली आहे.

मुलीच्या वडिलांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात एका गावामध्ये राहणाऱ्या व्यक्तीची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी दुपारच्या वेळी कापूस वेचण्यासाठी शेतामध्ये गेले होती. सायंकाळी बराच उशीर झाला तरी ती घरी आली नाही. म्हणून तिच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला असता ती आढळून आली नाही.

मुलीच्या वडिलांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली असून त्यांनी त्यात म्हटले आहे की, सदर मुलीला कोपरगाव येथील एका तरुणाने लग्नाची मागणी घातली होती. परंतु मुलीचे वय कमी असल्याने आम्ही आताच लग्न करणार नसल्याचे त्याला स्पष्ट कळवले होते. तरीही त्याने सदर मुलीशी फोन वरून संपर्क ठेवला होता.

तो सतत फोन करत होता. त्यामुळे मुलगी गायब होण्यामागे त्याचाच हात असावा म्हणून आमची त्याच्याविरुद्ध फिर्याद असून माझ्या मुलीला त्याने पळवून नेले आहे. अशा आशयाची फर्याद वडिलांनी पोलिसात दिली असून संगमनेर तालुका पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

