बँकांचे राष्ट्रीयीकरण, ऑपरेशन ब्लू स्टार सह बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी या देशाच्या कणखर नेत्या होत्या. देशाच्या विकासात ‘ इंदिरा पर्व ‘ अत्यंत महत्वाचे असून भारताच्या एकात्मता व अखंडतेसाठीच इंदिरा गांधींनी बलिदान दिले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

 

भारत जोडो यात्रा ही भारतीयांची मने जोडणारी — डॉ.  श्रीपाल सबनीस

प्रतिनिधी —

काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा असून स्व.इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मता व अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही लोकशाहीचा विचार व भारतीयांचे मने जोडणारी यात्रा असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे आणि यामध्ये लोकशाही वर विश्वास असणाऱ्या संघटना, पक्ष सहभागी होत असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले आहे.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील शक्तीस्थळ बागेत आयोजित अभिवादन व पुष्पांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ सुधीर तांबे हे होते. तर व्यासपीठावर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, ललिता सबनीस, इंद्रजीत थोरात, लक्ष्मण कुटे, संपत डोंगरे, रामहरी कातोरे, आर.बी.राहणे, नवनाथ अरगडे, सिताराम राऊत, रामदास वाघ, संपतराव गोडगे, विलास वर्पे, अभिजीत ढोले, मिलिंद कानवडे, सुभाष सांगळे, आनंद वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.

सबनीस म्हणाले की, इंदिरा गांधी धर्मनिरपेक्ष समाजवादी भारताची पायाभरणी केली असून देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले आहे. त्यांच्या बलिदानाचा विसर होणे हा कृतघ्नपणा आहे. देशाच्या विकासात इंदिरा पर्व अत्यंत महत्त्वाचे असून हरितक्रांती, विज्ञान क्रांती, घडवणाऱ्या इंदिरा गांधींनी बँकांच्या राष्ट्रीयकरणासह बांगलादेशची निर्मिती केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कणखर नेत्या म्हणून त्या गौरविल्या गेल्या. व्यक्तिगत जीवनातही अनेक संकटांना झेलत त्या पुढे आल्या. त्यांचे स्मरण हे फक्त काँग्रेसने नव्हे तर संपूर्ण देशाने केले पाहिजे. तसेच ६०० संस्थाने देशात विलणीकरणाचे काम लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले इंदिरा गांधी व सरदार पटेल हे भारतीय निष्ठेचे प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.

मात्र सध्या दुर्दैवाने देशात धार्मिकतेचे राजकारण सुरू आहे. लोकशाही ही धार्मिकतेवर आधारित नसून सर्वधर्मसमभावावर आधारित आहे. धार्मिकतेचे राजकारण हे देशाच्या एकात्मतेला धोका पोहोचवणारे असल्याचे ते म्हणाले.

आमदार डॉ तांबे म्हणाले की, स्वातंत्र्य सैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी जीवनात इंदिरा गांधी, सुभाष चंद्र बोस यांसह विविध राष्ट्रपुरुषांना आदर्श मानले. त्यांच्या प्रती कृतज्ञता असावी आणि त्यांच्या विचारांचे स्मरण व्हावे म्हणून अमृत उद्योग समूहात त्यांचे स्मारक उभे केले आहे. दिल्लीनंतर संगमनेर मध्ये शक्तिस्थळ हे येथील कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा देत असते. समाजमनाच्या विकासाचा विचार मांडणाऱ्या इंदिरा गांधींना शतकातील सर्वात कणखर नेतृत्व म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवले गेले असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी विलास कवडे, शांताराम कढणे, विनोद हासे, मोहन करंजकर, तात्या कुटे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, बाळासाहेब गायकवाड, निखिल पापडेजा, ऋतिक पावसे, शेखर सोसे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर रामदास वाघ यांनी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!