चार मुलांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी : आमदार डॉ. सुधीर तांबे
बर्डे कुटुंबियांचे केले सांत्वन; सर्वतोपरी मदत करणार
प्रतिनिधी —
चार मुलांचा मृत्यू होणे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे या कुटुंबाच्या आम्ही सर्वजण पाठिशी असून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिले.

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे विजेचा धक्का बसून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी वांदरकडा येथे येऊन बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या समवेत संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद माजी सदस्य अजय फटांगरे, मीरा शेटे, गणेश सुपेकर, सरपंच शिवाजी फणसे, नांदूरचे सरपंच जयवंत सुपेकर, सुनंदा भागवत, जयराम ढेरंगे, संपत आभाळे, संदीप आभाळे, गणेश लेंडे, विक्रम कजबे, दिनेश पावडे आदी उपस्थित होते.

लवकरच माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात कुटुंबाची भेट घेण्यासाठी येणार आहे. आम्ही सर्वजण या कुटुंबाबरोबर आहोत. ज्यांनी याबाबत हालगर्जीपणा केला त्यांच्यावर कारवाई झाली आहे. या घटनेचा सखोल तपास व्हावा. कारण दरवर्षी महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे वीज मंडळाने गांभीर्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले.

