लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा — पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
प्रतिनिधी —
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचे प्रमाण वाढवून लसीकरणाला वेग देण्यात यावा. यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहून कार्य करावे असे निर्देश राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले.

राज्यातील जनावरांना झालेल्या लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाने केलेल्या कार्यवाहीसंबधी महसुल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगर येथून राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता व आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते तर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉ.सुनिल तुंबारे उपस्थित होते.

महसूल मंत्री विखे पाटील यांनी, लम्पी चर्मरोग प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यातील पशुधनाच्या लसीकरणाचा आढावा घेतला. शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘लम्पी योद्धा’ बनून त्यांनी काम करावे अशी सूचना केली. राज्य सरकारने संवेदनशीलपणे लम्पीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. “माझे पशुधन, माझी जबाबदारी” घोषवाक्याची अंमलबजावणी करुन, पशुधन वाचविण्यासाठी शासनाच्या प्रयत्नांना सर्वांनीच सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्य शासनाने मागील काही दिवसात घेतलेल्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे पशूधन वाचविण्यात यश येत असल्याचे विखे पाटील म्हणाले.

राज्यात तीस जिल्हयात २३१ तालुक्यांत लम्पी रोगाचा प्रादूर्भाव असून राज्यात दररोज सध्या नऊ लाखावर लसीकरण होत असून हा वेग बारा लाखांवर नेण्यासाठी संबधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचना देऊन ३० सप्टेंबर २०२२ पर्यत एक कोटी पशुधनांचे लसीकरण होईली अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यात सध्या ७५ लाख लसी उपलब्ध असून लम्पी रोगाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. या रोगासंदर्भात सोशल मिडीयावरील दिशाभूल करणाऱ्या चूकीच्या संदेशांकडे पशुपालकांनी दुर्लक्ष करावे अशी सूचना त्यांनी केली.

