संगमनेर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे बॉस ठेकेदार !

रस्त्याचे काम दर्जाहीन आणि बोगस
सावतामाळी नगर मधला प्रकार
प्रतिनिधी —
संगमनेर नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांचे बॉस ठेकेदार असल्याचे चित्र आता पाहावयास मिळत आहे. पालिकेवर प्रशासन असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा ही ठेकेदार मंडळी जुमानत नाहीत.शहरातील विकासाची कामे अतिशय दर्जाहीन आणि बोगस पद्धतीने चालू असल्याचे दिसून येत आहे.

सावतामाळी नगर मधील स्टेडियम च्या पाठीमागे आणि पोलीस लाईन शेजारी अंकुश अभंग यांचे निवासस्थान ते स्टेडियम ची भिंत या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून ते अद्यापही पूर्ण झालेले नाही.
पावसाळा सुरू झाला असून देखील या ठिकाणी केलेले खोदकाम जसेच्या तसे आहे. गटारीच्या चेंबरचे काम पूर्ण होऊन पंधरा दिवस झाले तरी रस्त्याचे कुठलेही काम करण्यात सुरुवात झालेली नाही.

आज या संदर्भात नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता संबंधित कामाचे ठेकेदार व पालिकेच्या बांधकाम विभागाने यावर कळस केला असून रस्त्याची कुठलीही लेव्हल काढलेली नसताना, खोली पूर्ण झालेले नसताना रस्त्यावर थेट खडी टाकण्याचे व पसरवण्याचे काम सुरु केले. अतिशय बोगस पद्धतीने काम करण्यास सुरुवात झाली आहे. नवीन भूमिगत गटारीचे काम झाल्यानंतर जुन्या गटारीला बंद करणे आवश्यक आहे तरीही या गल्लीत मात्र जुनी गटार तशीच ठेवण्यात आलेली आहे.

जुन्या गटारीचे ढापे पूर्णपणे तुटलेले असून गटार मातीने भरलेले आहे. गटारीची कुठलीही स्वच्छता न करता ढापे न टाकता त्यावर खडी पसरून रस्ता करण्याचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. एकंदरीत कुठल्याही नियमाने हे काम होताना दिसत नाही. तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात नाहीत.
विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून या कॉलनीची स्ट्रीट लाईट पूर्णपणे बंद आहे. या लाईटची भूमिगत वायरिंग पूर्णपणे तुटलेली आहे. वायरिंग दुरुस्त करून ती जमिनीखाली गाडण्याचे काम झालेले नाही. असे असतान थेट खडी पसरवून रस्ता करण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले.

मुख्याधिकाऱ्यांच्या कानावर ही बाब गेली असता त्यांनी ताबडतोब हे काम थांबवले व पूर्ण नियमाप्रमाणे रस्त्याची लेवल खोदाई करून काम करावे असे आदेश दिले. तरीही ठेकेदार आणि त्यांचे समर्थक काम करणारे मुकादम वगैरे ऐकत नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले.
मुळात हा रस्ता इतका उंच होता की पावसाळ्यात पावसाचे पाणी काही लोकांच्या घरात घुसत होते. आता पुन्हा त्यावर रस्ता झाला तर पुन्हा लोकांच्या घरात पाणी घुसेल.
त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसू नये या पद्धतीने रस्त्याचे काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी रस्ता खोदून पुन्हा तयार करण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले. परंतु ठेकेदाराच्या मनमानीमुळे जसे वाटेल तसे काम सुरू आहे.
या प्रभागातील माजी नगरसेवकाचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याने ठेकेदाराची मनमानी असा प्रकार या ठिकाणी दिसून येत आहे.
