संगमनेरच्या विकासाला नवी झळाळी ; सीसीटीव्ही अन् फूड कोर्टचे सोमवारी लोकार्पण

संगमनेर प्रतिनिधी :
संगमनेर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण तसेच नेहरू गार्डन येथील फूड कोर्टचा शुभारंभ काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे अध्यक्षस्थानी असून आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून संगमनेर शहरातील नागरिक व महिलांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच नागरिकांसाठी नेहरू गार्डन परिसरात फूड कोर्ट अर्थात खाऊ गल्लीची निर्मिती करण्यात आली आहे.

या ठिकाणी सीसीटीव्हीचे लोकार्पण
सोमवारी सायंकाळी ५ वाजता त्रिमूर्ती चौक, जनता नगर कॉर्नर, संगमनेर बसस्थानक कॉर्नर, चावडी, तीन बत्ती चौक, चंद्रशेखर चौक तसेच नगरपालिका कोर्ट इमारत या ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सह्याद्री कॉलेजजवळील नेहरू गार्डन येथे फूड कोर्टचा शुभारंभ होणार आहे.
विविध स्मारकांची माहिती नागरिकांना मिळणार
कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, संविधान स्मारक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक याबाबतची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.

सायंकाळी ५.३० वाजता संगमनेर नगरपालिकेच्या प्रांगणात प्रमुख कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, सर्व माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, प्रमिला अभंग तसेच विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमास संगमनेर शहर व परिसरातील नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, सर्व विभागांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका आणि मुख्याधिकारी डॉ. दयानंद गोरे यांनी केले आहे.
