पोलिसांचा नशेडींवर हल्लाबोल !
तीन दिवसांत १९७ आरोपींवर कारवाई ;
5 लाख 17 हजार रुपयांचा गांजा जप्त
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात जोरदार धडक मोहीम राबवत अवघ्या तीन दिवसांत मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेत अमली पदार्थ सेवन करणारे १६६ जण आणि गांजा बाळगणारे ३१ जण अशा एकूण १९७ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान २२ किलो ५२८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ५ लाख १७ हजार ८१० रुपये इतकी आहे. संबंधित आरोपींविरुद्ध एकूण १५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. पोलिसांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, अमली पदार्थांची विक्री, साठवण आणि सेवन करणाऱ्यांविरोधातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
