जलजीवन योजनेची अपूर्ण कामे आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई होणार का ?

आमदार खताळांकडून कृतीची अपेक्षा 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत पाण्याचा प्रश्न ऐरणीवर होता. संगमनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. जलजीवन मिशनची कामे अपूर्ण आहेत. ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी अधिकारी कागदोपत्री कामे पूर्ण झालेले दाखवत आहेत असा स्पष्ट आरोप आमदार खताळ यांनी केला आहे. मात्र अशा ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल की नाही हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. आमदार अमोल कटाळांकडून कृतीची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 

संगमनेर तालुक्यात सुरू असलेली जलजीवन योजनेची कामे अपूर्ण आणि रखडलेली आहेत. त्यामुळे पाणी टंचाई देखील निर्माण झाली आहे. ठेकेदारांच्या हलगर्जी पणामुळे काही कामांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या आहेत असे सांगितले जाते. कामे अपूर्ण राहिली आहेत. मात्र अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत आहेत. या सर्व प्रकारावर आमदार अमोल खताळ यांनी आढावा बैठकीत नाराजी व्यक्त करीत संतापही व्यक्त केला. या कामांची मी स्वतः पाहणी करणार आहे असे त्यांनी स्पष्टपणे जरी म्हटले असले तरी पाहणी केल्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल का असा सवाल उपस्थित झाला आहे.

जलजीवनच्या कामांविषयी विविध शंका उपस्थित होत आहेत. या कामांसाठी मिळणाऱ्या निधीबाबतही थेट विधानसभा आणि विधान परिषदेत प्रश्न विचारण्यात आले. ठेकेदारांकडून अशा कामांना प्राधान्य देण्याऐवजी ही कामे अपूर्ण का ठेवली जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि तालुक्याला निदान पिण्याचे पाणी तरी पुरवायचे असेल तर जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांना करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!