वीज वितरणच्या गलथान कारभार विरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन !
पाणीपुरवठा योजनांचे तोडलेले वीज कनेक्शन सुरू करा – डॉ.जयश्रीताई थोरात
संगमनेर | प्रतिनिधी
राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. पिकांना पाण्याची गरज आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना अत्यंत कमी दाबाने व अवेळी वीज मिळत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा परीक्षांचा काळ सुरू आहे. अनेक ठिकाणी वीज पुरवठा बंद होत आहे. भर उन्हाळ्यामध्ये ग्रामपंचायतींसाठी असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे वीज कनेक्शन कट केल्याने अनेक नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत या सर्व गलथान कारभार विरोधात डॉ.जयश्री थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने वीज कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
वीज वितरण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात संगमनेर काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ.जयश्री थोरात, अजय फटांगरे, पद्मा थोरात, प्रमिला अभंग, योगिता सातपुते, प्रदीप हासे, राजू खरात, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब वाळके, रोहिणी गुंजाळ, नानासाहेब दिघे, किरण खुळे, सचिन गोरडे, तात्या कुटे, भास्कर शर्माळे, राजू गुंजाळ, दिगंबर इंगळे, भाऊसाहेब दिघे, सत्यजित थोरात, शेखर सोसे, शिवाजी गुंजाळ, दत्तात्रय खुळे, संजय कुटे, योगेश पोकळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
संगमनेर शहर व तालुक्यामध्ये व्यवस्थित वीजपुरवठा होत नाही. याचबरोबर वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून त्यांनाही अभ्यासाकरता वीज उपलब्ध होत नाही. गावोगाव पाणीपुरवठा योजनांची वीज कनेक्शन तोडल्यामुळे प्यायला पाणी मिळत नाही. या गलथान कारभाराविरोधात वीज वितरण ला जाब विचारण्यात आला.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, सध्या राज्यभरात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत, नागरिकांना सुविधा देणे ही वीज वितरणची जबाबदारी आहे. अशी परिस्थिती असताना सरकारने मात्र गावोगावी असलेल्या पाणीपुरवठा योजनांची लाईट बंद केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भर उन्हाळ्यात महिलांचे मोठे हाल होत आहे. एकीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. शहरांमध्ये अनेक पेशंट दवाखान्यांमध्ये दाखल असतात. शहर व तालुक्यामध्ये अत्यंत कमी दाबाने लाईट पुरवठा केला जात आहे. शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळत नाही. या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी विद्यार्थी व महिला त्रस्त झाले आहेत. गुंजाळवाडी, वडगाव पान, समनापुर, खांडगाव यांसह विविध गावांमधील पाणीपुरवठा योजनांची वीज कट झाल्याने योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्यासाठी महिला व नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
एका बाजूला मोठमोठे भांडवलदार, कंपनी मालक उद्योजक यांना वीज बिल माफ केले जाते. मात्र शेतकऱ्यांना आणि पाणीपुरवठा योजनांना कोणतीही सवलत दिली जात नाही हा कोणता न्याय आहे ? शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे मात्र त्याच्याकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष होत असून हे सरकार शेतकरी विरोधी आहे. महागाई व गॅस वाढीने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे.
तरी महावितरण विभागाने वीज वितरणासाठी प्राधान्यक्रम ठरवला पाहिजे पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी, शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास, दवाखाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून नियमित व वेळेत वीज पुरवठा करावा व याबाबतचे वेळापत्रक तयार करून सर्व शेतकरी नागरिक व तालुक्यातील जनता यांना याबाबत जागृत करावे व दिलेल्या वेळेत पूर्ण दाबाने व सुरळीत वीज पुरवठा करावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यावेळी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी गावोगावी असलेल्या विविध समस्या याबाबत वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या. यानंतर मुख्य कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांनी येत्या एक-दोन दिवसांमध्ये तातडीने वीजपुरवठा सुरळीत करू असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.


