महायुतीमध्ये गोंधळाची स्थिती — माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद
जळगाव, जामोद येथे सातपुडा कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून अमरावती, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधला असून शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी करताना महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारमध्ये सध्या गोंधळाची स्थिती असल्याची त्यांनी म्हटले आहे.

विदर्भातील अमरावती, अकोला, अकोट, शेगाव, जळगाव, जामोद येथे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जामोद मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सातपुडा कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कृष्णराव इंगळे यांच्यासह विदर्भातील विविध काँग्रेस पक्षाचे नेते होते.

थोरात म्हणाले की, कृष्णराव इंगळे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नक्कीच नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. दहा एकर परिसरामध्ये उभारलेल्या या कृषी प्रदर्शनातून प्रात्यक्षिके, शेती, योग्य फळे, भाजीपाला, वनौषधी, फुल शेती, व्यावसायिक व उपयुक्त साधनांची दालने यामुळे शेतकऱ्यांना या क्षेत्रातील बदलांची माहिती मिळणार आहे. भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी आणि शेती या विषयावर अर्थव्यवस्था अवलंबून आहे म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी केली. याचबरोबर राज्यामधील महायुती सरकारमध्ये सध्या गोंधळाची स्थिती असून भाजपच्या खेळीमुळे राज्याच्या राजकारणाचे मोठे नुकसान होत असल्याची टीका त्यांनी केली यामुळे गटतट वाढले असून असे राजकारण राज्यासाठी दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह विविध पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. शेगाव येथे श्री संत गजानन महाराज देवस्थानच्या वतीने मुख्य मंदिर परिसरात लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
