कासारा दुमालात विविध विकास प्रकल्पांना अभिनेते भाऊ कदम यांची भेट
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाची जनजागृती करत साधला संवाद
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांच्यातर्गत राबविण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते भाऊ कदम यांनी भेट दिली. यावेळी आमदार अमोल खताळ, निलम खताळ यांच्यासह सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व ग्रामीण भागात जनजागृती करण्या साठी अहिल्यानगर जिल्हापरिषदेच्या वतीने मराठी सिनेअभिनेते भाऊ कदम यांची निवड करण्यात आली आहे. या अनुषंगाने त्यांनी संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी गावातील जनार्दन जाधव यांचा मोहगणी वृक्ष लागवड प्रकल्प, तुळशीराम सातपुते यांचा गाय गोठा प्रकल्प, मीराबाई अभंग यांचा घरकुल प्रकल्प, रुक्मिणी महिला बचत गट व्यवसाय प्रकल्प तसेच घनश्याम गुंजाळ यांचा लिंबू लागवड प्रकल्प, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामपंचायत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प,फिल्टर पाणी योजना, स्मशानभूमी व नदी घाट परिसर अशा विविध प्रकल्पाची पाहणी करत संवाद साधला.

गावातील बाबाजी समाधी मंदिर परिसरात स्वच्छता मोहिमे व श्रमदान करण्यात आले या श्रमदानात स्वतः अभिनेते भाऊ कदम, नीलम खताळ, सरपंच राजेंद्र त्रिभुवन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश काळे यांच्यासह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यानंतर अभिनेते भाऊ कदम यांनी जिल्हा परिषद शाळा व काशेश्वर माध्यमिक विद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांशी संवाद साधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे गावाच्या सर्वांगीण विकासा साठी कसे उपयुक्त आहे, याची सविस्तर माहिती दिली.
