चमत्कार : संगमनेरात ‘काश्मीर’…….
थोरात कृषी महाविद्यालयात ट्युलीप फुलांच्या गार्डनचा प्रयोग यशस्वी
संगमनेर प्रतिनिधी —
नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या संगमनेर येथील अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या परिसरात महाराष्ट्रातील पहिल्या ट्युलीप गार्डनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असून, या अनोख्या उपक्रमामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष संगमनेरकडे वेधले गेले आहे. हा अभिनव आणि धाडसी प्रयोग माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.

ट्युलीप ही फुले मुख्यतः थंड हवामानातच फुलतात. देशात काश्मीर खोऱ्यातील ट्युलीप गार्डन हेच याचे प्रमुख उदाहरण मानले जाते. दरवर्षी फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत लाखो पर्यटक काश्मीरला भेट देतात. हीच संकल्पना महाराष्ट्रात, विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यासारख्या तुलनेने उष्ण हवामानाच्या भागात प्रत्यक्षात आणणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टी, चिकाटी आणि कृषीविषयक अनुभवाच्या जोरावर हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्यात आले आहे.

कृषी महाविद्यालय हे केवळ शिक्षण देणारे केंद्र न राहता, नवनवीन प्रयोगांचे आणि संशोधनाचे केंद्र बनले पाहिजे ही भूमिका थोरात यांनी नेहमीच मांडली आहे. त्याच भूमिकेतून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या फुलशेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, तसेच संगमनेरच्या भौगोलिक वैशिष्ट्यांचा उपयोग करून काहीतरी वेगळे करता यावे, या उद्देशाने ट्युलीप गार्डनची संकल्पना त्यांनी मांडली.

या गार्डनसाठी हॉलंड येथून उच्च प्रतीचे ट्युलीप कंद आयात करण्यात आले. तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तापमान, मातीचा प्रकार, पाणी व्यवस्थापन आणि खतांचे नियोजन करण्यात आले. दीर्घ काळाच्या मेहनतीनंतर गुलाबी, पांढरे, पिवळे, लाल, जांभळे आणि नारंगी रंगांचे आठ वेगवेगळ्या जातींचे ट्युलीप्स आता पूर्ण बहरात आले आहेत. ट्युलीप गार्डनमध्ये प्रवेश करताच रंगीबेरंगी फुलांची नजरवेधक रांग, आल्हाददायक वातावरण आणि सुगंधाने भरलेली हवा मनाला मोहून टाकते. आपण काश्मीरमध्येच आलो की काय?” असा अनुभव व्यक्त करत आहेत. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण, संशोधन आणि प्रात्यक्षिकासाठी हे गार्डन उपयुक्त ठरणार आहे.या ट्युलीप गार्डनमुळे संगमनेर तालुक्याला कृषी पर्यटनाचा नवा चेहरा मिळत आहे.
