सेमी हायस्पीड नाशिक – पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी — आमदार अमोल खताळ यांची ठाम भूमिका
वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासणार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
सेमी हायस्पीड नाशिक – पुणे रेल्वे ही संगमनेर मार्गे व्हावी हा माझा पूर्वीपासूनचा ठाम आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. हा कोणाच्या विरोधाचा किंवा कोणाचे समर्थन करण्याचा विषय नाही. तो आपल्या संगमनेरच्या उज्ज्वल भविष्याचा प्रश्न आहे त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

या संदर्भात आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी कार्यालयाकडून प्रेस नोट देण्यात आलेली आहे त्यात म्हटले आहे की, रेल्वे मार्गासाठी GMRT संदर्भात काही तांत्रिक कारणे पुढे केली जात असली तरी या निर्णयाचा संगमनेरच्या विकासावर होणारा परिणाम गंभीर आह. “सरकारलाही या निर्णयाचे परिणाम जाणवत आहेत. त्यामुळेच मी केंद्र व राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रक्रिया पुन्हा तपासण्या बाबत मागणी करणार आहे,” असे आमदार खताळ यांनी म्हटले आहे.

संगमनेरचा विकास, शहराची भविष्यातील कनेक्टिव्हिटी आणि नागरिकांच्या सुविधांचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाने या निर्णयाकडे गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
“संगमनेरचा हक्क अबाधित राहावा, हीच आमची भूमिका आहे. नागरिकांच्या अपेक्षा योग्य दिशेने पूर्ण होत नसतील, तर त्यांच्या सोबत ठाम उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे.” असेही असेही आमदार खताळ यांनी शेवटी म्हटले आहे.
