आदर्श राष्ट्र निर्माण करण्यासाठी समाज समजून घ्यावा लागतो.– डॉ.सोमनाथ सातपुते
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
ज्या समाजात आपण काम करतो तो समाज आपण समजून घेतला पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजनेसारख्या शिबिरांतून हे सहज शिकता येते.त्यातूनच आदर्श राष्ट्र निर्माण होत असते. असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सोमनाथ सातपुते यांनी केले.
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक संस्थेचे शालेय समिती सदस्य प्रा. दिलीप सांगळे,गुंजाळवाडीचे लोकनियुक्त सरपंच नरेंद्र गुंजाळ, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प प्रमुख प्रा.नितेश सातपुते,प्रा.सचिन कानवडे,प्रा.सुशांत सातपुते आदी उपस्थित होते.

डॉ.सातपुते पुढे म्हणाले, दैनंदिन कामापेक्षा वेगळा अनुभव आपल्याला इथे मिळतो. शिक्षणाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर अशा शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायला हवे. इथे केलेल्या श्रमातून तुमच्यामध्ये सकारात्मक उत्साह निर्माण होतो. स्वतःची जाणीव होते. दुसऱ्यासाठी काम करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली की, आपला खऱ्या अर्थाने विकास होत जातो.भविष्यातील आदर्श नागरिक तयार करण्याचे काम ही शिबिरे करत करत असतात. त्यामुळे आपण या शिबिरांकडे गांभीर्याने पाहायला हवे. हा तुमचा चिडकेपणाचा काळ आहे. यातून सावरण्यासाठीही हे शिबिर महत्त्वाचे आहे. असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी दिला.

सरपंच गुंजाळ म्हणाले, इतक्या लहान वयात तुम्हाला समाजसेवा करण्याची संधी मिळालेली आहे. इथे कोणीही लहान व मोठा नाही. हाच विचार घेऊन घरी जा.तो समाजात पसरवा.विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.स्वतःचा विकास करा. देशाच्या प्रक्रियेमध्ये शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.त्यामुळे चांगले शिक्षण घ्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नितेश सातपुते यांनी, परिचय प्रा. आप्पासाहेब गुंजाळ, सूत्रसंचालन प्रा. सविता शेळके यांनी तर आभार प्रा.तेजस्विनी पेठकर यांनी मानले.
यावेळी प्रा. रसिका दीक्षित, प्रा.सविता शेळके, प्रा.किरण देशमुख, प्रा.नवनाथ घुगे, प्रा.सिमरन पिलारे, प्रा.मीनाक्षी पुरी, शिक्षकेतरवृंद आदी उपस्थित होते.
