संतप्त शेतकऱ्यांनी कांदा ओतला रस्त्यांवरच्या खड्ड्यात !
कांद्याला भाव नाही ; महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
केंद्र व महायुतीचे राज्य सरकार हे भांडवलदार आणि श्रीमंतांचे सरकार आहे. या सरकारला शेतकरी आणि गोरगरिबांचे कोणतेही घेणे देणे नाही. राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. कांद्याला अवघा 180 रुपये क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकऱ्यांनी पाच ट्रॅक्टर ट्रॉली भरलेले कांदे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकून सरकार विरोधात घोषणा देत तीव्र आंदोलन केले.

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे कांद्याला 180 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले. यावेळी सरकारकडे पैसे नसल्याने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या रस्ते दुरुस्तीसाठी सर्व शेतकऱ्यांनी हे पाच ट्रॅक्टर कांदे खड्ड्यांमध्ये टाकले. ही आमच्याकडून सरकारला मदत असे म्हणत घोषणाबाजी केली.
यावेळी बाळासाहेब गायकवाड, गणेश गडगे, सोसायटीचे चेअरमन आबासाहेब थोरात, प्रशांत थोरात ,कैलास थोरात, बाबासाहेब थोरात, मनोज थोरात, निलेश थोरात, संभाजी थोरात, मंगेश थोरात, अजय थोरात, सोमनाथ कुळधरण, नरेंद्र वायकर, संदीप काशीद, धनंजय थोरात ,सतीश थोरात, सुनील थोरात, गणपत थोरात, आदींसह युवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, महाराष्ट्रातील राज्य सरकार हे शेतकरी विरोधी आहे त्यांना गोरगरिबांनी शेतकऱ्यांचे काही घेणे देणे नाही. निवडणुकीमध्ये घोषणाबाजी केली की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शेतीमालाला हमीभाव देऊ मात्र असे काही झाले नाही. उलट आज १८० रुपये क्विंटल अशा कांद्याला भाव दिला ही शेतकऱ्यांची थट्टा आहे.
सरकारकडे पैसे नाहीत घोषणाबाजी मात्र खूप करत आहे रस्त्यांवर खड्डे पडले आहे म्हणून हे खड्डे बुजवण्यासाठी आम्ही कांदे टाकत आहोत असे ते म्हणाले.

तर निलेश थोरात म्हणाले की, तरुणांना काम नाही बेरोजगारी वाढली आहे शेतीमालाला भाव नाही अशी स्थिती असताना फक्त मोबाईल मध्ये तरुणांना गुंतू ठेवण्याचे काम या लोकांनी केले आहे. इंस्टाग्राम च्या जमान्यात वेगवेगळ्या रील तयार करायच्या. अभद्र टीका करायची. या सरकारचे दिवस आता भरले असून सर्वसामान्य नागरिक व युवक पेटला आहे. महायुती सरकारला खाली खेचण्यासाठी सर्व युवकांनी एकत्र येऊन लढा असे आव्हान त्यांनी केले
सर्व शेतकऱ्यांनी रस्त्यावर येऊन आपले सर्व कांदे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये टाकले पाच ट्रॅक्टर कांदे रस्त्यावर आल्याने सर्व परिसर लाल कांद्यांनी भरून टाकला होता रस्त्यांवरील खड्डे दिसत नव्हते त्यामुळे सर्व कांदेच कांदे रस्त्यावर झाले होते. यावेळी तरुणांनी महायुती सरकार सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
