उद्धट कीर्तनकाराने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेली टीका व दिलेली धमकी संगमनेरची स्वाभिमानी जनता कधीही सहन करणार नाही –– आमदार सत्यजित तांबे
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर अश्लाघ्य भाषेतील टीका आणि त्यांना देण्यात आलेली मारण्याची धमकी यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात आणि वारकरी संप्रदायात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून तथाकथित कीर्तनकार संग्राम भंडारे यांचा सर्वत्र निषेध होत आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी सोशल मीडियावर या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटले आहे की, बाळासाहेब थोरात टिका करताना विरोधक सुध्दा जपून शब्द वापरतात त्यामुळे संत-महात्म्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात स्वतः ला कीर्तनकार म्हणून घेणाऱ्या एका उध्दट व्यक्तीने त्यांच्या विषयी जे काही बोलले ते महाराष्ट्रातील कोणत्याही वारकरी संप्रदायातील किर्तनकारांना आवडलेले नाही.

सहकार, शिक्षण, कृषी, सांस्कृतिक सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संगमनेरचे नाव बदनाम करण्याचा काही घटना मागील काळात सातत्याने सुरु करण्यात आल्यात. या घटना फक्त राजकीय नाहीत किंवा फक्त थोरात साहेबांशीच संबंधित नाही, मध्यंतरी संगमनेरचे नाव देशभर प्रसिद्ध करणाऱ्या एका उद्योगपतीला त्याने “ होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे “ बोलल्याबद्दल फार वाईट भाषेत टीका सहन करावी लागली.

आज संगमनेरच्या सहकारी व सहकारी बॅंकांमधील ठेवी आज ७००० कोटींच्या घरात आहेत, संगमनेरात रोज ९ लाख लिटर दूध तयार होते, संगमनेर मधील दोनच गावात कुक्कुटपालनातून रोज ७ लाख अंडे तयार होतात, संगमनेर कारखाना राज्यातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणून ओळखला जातो, संगमनेरमध्ये ५ मेडिकल कॉलेज आहेत ज्यातील चार बाळासाहेब थोरातांच्या विरोधकांचे आहेत म्हणजेच येथे द्वेषाचे राजकारण नाही, संगमनेरात सगळ्या शिक्षण संस्था मिळून २५००० मुले-मुली उच्च शिक्षण घेतात. प्रवरा नदीला पाणी नसतांना संगमनेर शहराला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती आता निळवंडे धरणातून २४ तास स्वच्छ पाणी भेटते.

हे काय उगाच झालेले नाही, पर्जन्य छायेच्या भागात असलेला व एके काळचा दुष्काळी तालुका आज सुजलाम सुफलाम झाला यात स्वातंत्र्य सेनानी स्व. भाऊसाहेब थोरात व त्यांच्या नंतर बाळासाहेब थोरात यांचे प्रचंड योगदान आहे जे कोणीही शहाणा माणूस नाकारू शकत नाही.
कालच्या तथाकथित कीर्तनकाराची टिका ही राजकीय तर आहेच पण संगमनेरच्या सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे. संगमनेरची स्वाभिमानी जनता हे कधीही सहन करणार नाही !
